(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ माजली आहे. अंकुर वाढवेने शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.यवतमाळमधील पुसद या गावी त्याच्यावर ते ३० लोकांच्या टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी फेसबुक पोस्ट अंकुरने शेअर केली आहे. यापोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेबद्दल अंकुरने सविस्तरपणे पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
अंकुरने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ” पुसदमध्ये काल माझ्यावर २० ते ३० लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने मिटलं आहे. पण, यावरून लक्षात येतं की पुसद मध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे. ”
अंकुरने सविस्तरपणे सांगितले प्रकार
आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांकडून विचारपूस होत असल्याने आपण लाइव्ह येत असल्याचे अंकुर वाढवेने सांगितले. यावेळी त्याने आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे स्पष्ट केले.
अंकुर म्हणाला, ”नमस्कार! मला काहीही झालं नाहीये, मी सुखरूप आहे. पुसदमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. माझे काही मित्र त्या चित्रपटासाठी प्रोडक्शनचं काम करत होते. ज्यावेळी त्यांना समजलं की, मी सुद्धा पुसदमध्ये आहे… त्यावेळी ते मला घरी भेटण्यासाठी आहे. माझ्या मित्रांसोबत काहीजण असेही होते ज्यांनी दारू प्यायली होती. त्यांनी आमच्या शेजारच्या घरांवर मद्यप्राशन करून लघुशंका केली. मग त्या लोकांनी मला फोन केला की, तुमचे पाहुणे आमच्या दारावर असा- असा प्रकार करत आहेत. त्यानंतर मी आणि माझ्या भावाने त्या लोकांना परत पाठवले, आणि मित्रालाही पाठवून दिले.”
अंकुरच्या म्हणण्यानुसार, त्याच्या घरी आलेल्या काही पाहुण्यांपैकी एका व्यक्तीची चूक असल्याने वाद निर्माण झाला. संबंधित व्यक्ती निघून गेल्यानंतर तोच युवक पुन्हा ३० ते ४० जणांना घेऊन परत आला. हे सर्वजण मारहाण करण्याच्या उद्देशाने आल्याचा दावा अंकुरने केला आहे. मात्र, उपस्थितांपैकी काहींनी त्याला ओळखल्याने परिस्थिती आणखी बिघडली नाही आणि पुढे वाद मिटला.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विचार करताना सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाल्याचे अंकुर ने सांगितले. “माझ्याकडे ३०-४० जण येऊ शकतात, तर सामान्य लोकांची काय अवस्था होत असेल? एका फोनवर इतक्या मोठ्या संख्येने लोक मारहाण करण्यासाठी येत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे त्याने म्हटले.
दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मार्गी लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अशा प्रवृत्तीच्या गावगुंडांना योग्य समज देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्याने केली. “याच कारणासाठी मी हा व्हिडिओ शेअर केला. बाकी मी पूर्णपणे सुखरूप आहे,” असेही अंकुरने स्पष्ट केले.






