(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अभिनेता श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट एका अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करतो. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम या विषयाला चित्रपटाने हात घातला आहे. विषय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा असला, तरी कमकुवत पटकथा आणि प्रभावी मांडणीचा अभाव यामुळे चित्रपट अपेक्षित उंची गाठू शकत नाही.
चित्रपटाची कथा माजी लष्करी अधिकारी मेजर योगेश पाटील (श्रेयस तळपदे) यांच्याभोवती फिरते. त्यांच्या सात वर्षांच्या मुली परी (त्रिशा शारदा) हिला रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान होतं. उपचारासाठी सर्वस्व पणाला लावूनही योगेश आपल्या मुलीला वाचवू शकत नाही. पुढे त्याला समजतं की अन्नातील घातक कीटकनाशकांमुळेच तिचा कर्करोग झाला होता. त्यानंतर तो सरकार, कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रसायनांचा अतिवापर करणाऱ्या व्यवस्थेविरोधात न्यायालयीन लढा उभा करतो.
या लढ्यात त्याची साथ देते वकील अर्चना (काजल अग्रवाल). न्यायालयात ती कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे देशात वाढणाऱ्या कर्करोगाच्या घटनांकडे लक्ष वेधते. योगेश आणि अर्चना यांची ही न्यायासाठीची लढाई शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करते.
लेखक सागर बी. शिंदे यांनी सत्य घटनांपासून प्रेरणा घेत कथा लिहिली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध ‘कॅन्सर ट्रेन’, केरळमधील कर्करोगाचे हॉटस्पॉट, फळे-भाज्यांवर होणारी रासायनिक फवारणी आणि भेसळयुक्त दूध यांसारख्या वास्तव समस्यांवर चित्रपट प्रकाश टाकतो. त्यामुळे चित्रपटाचा आशय निश्चितच प्रभावी आणि समकालीन वाटतो.
मात्र, दिग्दर्शक चेतन डीके या गंभीर विषयाला प्रभावी सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करण्यात कमी पडतात. चित्रपटाची पटकथा न्यायालयीन नाट्य आणि भावनिक प्रसंगांमध्ये सतत हेलकावे खाते. त्यामुळे कथानकाचा प्रवाह विस्कळीत वाटतो. पूर्वार्ध काहीसा माहितीपटासारखा भासतो, तर न्यायालयीन संघर्षात आवश्यक ती धार आणि थरार जाणवत नाही. विरोधी बाजूचा युक्तिवादही पुरेशा ताकदीने मांडला जात नसल्याने संघर्ष एकतर्फी वाटतो.
अभिनयाच्या बाबतीत श्रेयस तळपदे ने दुःख, संताप आणि संघर्ष यांचा समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काजल अग्रवालची भूमिका संयमी असून तीनेही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. बालकलाकार त्रिशा शारदा हिचाही अभिनय प्रभावी ठरतो.






