पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज (दि.23) १५२ जागांसाठी मतदान होत आहे. उत्तर बंगालमधील आठ जिल्हे, दक्षिण बंगालमधील तीन जिल्हे आणि जंगलमहाल प्रदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे, जिथे प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक लढवत आहेत. राज्याच्या राजकीय भवितव्यासाठीही हा पहिला टप्पा निर्णायक मानला जात असून, यामध्ये अंदाजे ३.६ कोटी मतदार १,४७८ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
हे देखील वाचा : गृहमंत्री अमित शाहच्या मोठ्या दाव्याने खळबळ, निवडणूक हरणार ‘दीदी’, सत्तेवर BJP आल्यास…
या टप्प्यात पुरुलिया, बांकुरा, झाडग्राम, पश्चिम मेदिनीपूर, पूर्व मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा या जिल्हांचा समावेश आहे. या टप्प्यात कोलकाता आणि हावडा येथील काही जागांवरही मतदान होणार आहे. नंदीग्राम, खरगपूर, पुरुलिया, बांकुरा आणि झाडग्राम या जागांवर तीव्र लढत अपेक्षित आहे, जिथे भाजप, टीएमसी आणि काँग्रेसमधील अनेक प्रमुख राजकीय दिग्गज निवडणूक लढवत आहेत.
नंदीग्राममध्ये सुवेंदूचे भवितव्य ठरणार
नंदीग्रामची जागा पुन्हा एकदा चर्चेत आहे, जिथे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात टीएमसीचे पवित्र कर उभे आहेत. २०२१ मध्ये अधिकारी यांनी याच जागेवरून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता, त्यामुळे ही जागा राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
आसनसोलमध्ये प्रतिष्ठेची लढाई
आसनसोल दक्षिण मतदारसंघात, भाजपच्या अग्निमित्रा पॉल २०२१ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत. टीएमसीचे तापस बॅनर्जी कडवे आव्हान उभे करत आहेत. बॅनर्जी यांनी यापूर्वी ही जागा दशकभर राखली होती, त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.
हे देखील वाचा : West Bengal Election 2026 रक्ताचा सडा अन् किंकाळ्या! दांतनमध्ये भाजपच्या रॅलीवर शस्त्रसज्ज हल्ला; भाजप उमेदवार जखमी
अधीर रंजन चौधरी विरुद्ध सुभ्रत मैत्रा
बहरमपूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी आणि भाजपचे सुभ्रत मैत्रा यांच्यात लढत आहे. चौधरी पाच वेळा खासदार राहिले आहेत आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. २०२४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, ते आता विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
खरगपूर सदरमध्येही चुरशीची लढत
खरगपूर सदर मतदारसंघात अटीतटीची लढत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि टीएमसीचे प्रदीप सरकार यांच्यात सामना आहे. दिलीप घोष यांनी २०१६ मध्ये ही जागा जिंकली होती आणि आता ते ती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर प्रदीप सरकार यांनी २०१९ ची पोटनिवडणूक जिंकून टीएमसीला विजय मिळवून दिला होता.






