ओझर्डे येथे कार ओढ्यात कोसळून अपघात; चालक जखमी
वाई : वाई-वाठार रस्त्यावरील ओझर्डे गावच्या हद्दीत एक अपघात झाला. श्री स्वामी समर्थ मठ, कदमवाडी नजीकच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्यामुळे एक चारचाकी गाडी ओढ्यात कोसळली. ही घटना रविवारी (दि.१२) दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पुलाला कठडा नसल्याने थेट बाजूच्या ओढ्यात खोलवर कोसळली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी गाडीतून जखमी चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. चालकाचे नाव समजू शकले नसले तरी, तो नांदवळ, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील रहिवासी असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पुलाला कठडा नसल्यामुळे अपघाताचा धोका नेहमीच असतो.
हेदेखील वाचा : फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट
याबाबत बांधकाम विभागाला वारंवार सूचना आणि मागणी करूनही, विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा पूल धोकादायक बनल्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित या पुलावर संरक्षक कठडा बसवून भविष्यातील संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक भयानक रस्ता अपघात झाला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला. त्यात एकूण २२ कामगार होते, त्यात सर्वांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, यापैकी १९ कामगार आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकुरी टी इस्टेटचे रहिवासी होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १३ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित कामगारांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.






