अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक 'ज्ञानपीठ' उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार कालातीत असून आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कष्टकरी, शेतकरी आणि वंचित समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा 27 जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाल्याची आठवण करून दिली.
अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर 2016 मध्ये हा निर्णय घेतला गेला. नंतर प्रकल्पाला गती देत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हा प्रकल्प केवळ स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ज्ञानपीठ ठरेल.
या प्रकल्पात पुढील सुविधा उभारण्यात येणार आहेत:
20 मीटर उंच कांस्य पुतळा
‘फकिरा’ कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प
आधुनिक ग्रंथालय
संशोधन व प्रशिक्षण केंद्र
कौशल्य विकास केंद्र
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन
मुलांसाठी डिस्कव्हरी झोन
अण्णाभाऊंच्या 255 किमी पायी प्रवासाचे विशेष दालन
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की, सुमारे 305 कोटी रुपये खर्चून 18 हजार चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रेरणेचा संगम या संस्थेत पाहायला मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी वाटेगाव येथे 50 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्याची घोषणाही केली. तसेच बार्टीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली ‘आर्टी’ (ARTI) संस्था सामाजिक न्याय, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘पारदर्शकतेकडून परिवर्तनाकडे’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या प्रकल्पामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश-विदेशातील नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.






