'एकत्र काम केल्यास 2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई...', राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. युवकांना व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि सामाजिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले …
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत नशामुक्तीची शपथ घेतली. कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणार नाही, इतरांनाही त्यापासून दूर राहण्यास प्रोत्साहित करू आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेऊ, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, समुपदेशन शिबिरे, प्रबोधनपर उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
व्यसनमुक्त, निरोगी आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे अभियान राज्यभर व्यापक स्वरूपात राबविले जाणार असून, समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी BEST बस, बसथांबे आणि मेट्रो स्थानकांवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
या अभियानात सहभागी होण्यासाठी drugfreemumbai.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून नशामुक्तीची शपथ घेतल्यानंतर तात्काळ डिजिटल प्रमाणपत्र देखील उपलब्ध होणार आहे.
शाळा, महाविद्यालये, पालक, शिक्षक, आरोग्य क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून व्यसनमुक्त, सुरक्षित आणि निरोगी मुंबई घडविण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. तरुणाईला योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि सामाजिक पाठबळ देऊन अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal …






