सौजन्य - नवराष्ट्र टीम
धाराशिव/शितलकुमार शिंदे : मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी २८ जुलै रोजी धाराशिवच्या रस्त्यांवर शक्तिप्रदर्शन करत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला. दुपारी २ वाजता जिजाऊ चौकातून निघालेला मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सुरुवातीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही महिलांसह हजारो आंदोलकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. पावसाचा जोर कायम असतानाही आंदोलक जागेवर ठाम उभे राहिले. आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत आरक्षणाला धक्का देण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी प्रमुख वक्ते रिपब्लिकन सरनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर थेट हल्लाबोल चढवला. “संविधानामुळेच चहावाला पंतप्रधान झाला, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला. आज त्याच संविधानाने दिलेल्या आरक्षणावर घाला घालण्याचे धाडस होत आहे. सरकारने आंबेडकरी समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री विधानसभेत आरक्षणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत आनंदराज आंबेडकर म्हणाले, “मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करत आहेत. विधानसभेत जनतेची दिशाभूल केली जात आहे. ही अत्यंत शरमेची आणि दुर्दैवी बाब आहे.” उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले, “2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती हा एकसंध (Homogeneous) वर्ग असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानेही तीच भूमिका कायम ठेवली. मग सरकार कोणत्या आधारावर उपवर्गीकरणाचा आग्रह धरत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्रातील आणि राज्यातील नेतृत्वावर टीका करत आनंदराज आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र आणि देवेंद्र यांना एवढीच हौस असेल तर सवर्णांमध्ये उपवर्गीकरण करून दाखवा. मनुवादी व्यवस्थेतील लोकांनीच सर्वाधिक संधी बळकावल्या आहेत; मात्र सरकारची नजर आरक्षणावर आहे.” आंबेडकरी समाजाच्या एकजुटीचा उल्लेख करत त्यांनी सरकारला इशारा दिला. “आंबेडकरी समाजाशी गाठ आहे. आम्ही जेव्हा एकत्र उभे राहतो, तेव्हा आमच्यासमोर उभे राहण्याची कुणाची हिंमत होत नाही.”
भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक लढ्याचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले. “भीमा-कोरेगावचा इतिहास घडवणारी हीच जमात आहे. तेव्हा आम्ही पाचशे होतो; आज करोडोंच्या संख्येने आहोत. त्यामुळे सरकारने आमच्या नादी लागू नये. आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न महागात पडेल,” असा इशारा त्यांनी दिला. महापुरुषांच्या स्मारकांबाबतही त्यांनी राज्यकर्त्यांवर टीका करत, त्यासाठी आवश्यक संवेदनशीलता आणि इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला. पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या मोर्चाने धाराशिवमध्ये आंबेडकरी समाजाची संघटनशक्ती आणि आंदोलनाची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित केली. यावेळी राजा ओहाळ, धनंजय शिंगाडे, कैलास शिंदे, नितीन शेरखाने, संजय बनसोडे, डी. जी. हौसलमल, पृथ्वीराज चिलवंत आदींसह अन्य कार्यकर्त्यांनीही भाषणे केली.






