सोलापुरात २५ कडुलिंबाच्या झाडांची कत्तल टळली
निर्मिती विहार परिसरातील काही जागरूक नागरिकांना महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये संशयास्पद पद्धतीने वृक्षतोड सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने याबाबत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून त्वरित कारवाईचे निर्देश दिले.
अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक कडुलिंब वृक्ष आधीच तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच आणखी २५ वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारे कोयते, मशीन, पेट्रोल, रासायनिक पदार्थ (ॲसिड) तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.
संबंधितांकडून वृक्षतोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचेही तपासात उघड झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी शहरातील ११० वृक्षतोडीचे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका वृक्षतोडीच्या प्रयत्नाचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
“वृक्ष हे शहराचे फुफ्फुस आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”-ज्ञानेश्वरी देवकर, उपमहापौर, सोलापूर महानगरपालिका






