हरभरा-तूरच्या सरकारी खरेदीला आला वेग! अमरावती जिल्ह्यात १५ केंद्रांवर ९ हजार १४५ शेतकऱ्यांची झाली नोंदणी पूर्ण
जिल्ह्यात रब्बी पणन हंगामात हरभरा आणि तूर या प्रमुख कडधान्यांच्या सरकारी खरेदीला वेग आला असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात १५ सरकारी खरेदी केंद्रे सुरू केली आहे. या केंद्रांवर आतापर्यंत ९ हजार १४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण १६ हजार ९७७.५ क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. रब्बी पणन हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हरभरा व तूर खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि बाजारातील चढउतारांचा फटका बसू नये यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी १५ सरकारी खरेदी केंद्रे कार्यान्वित केली आहे. या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीवर खरेदी केली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)
जिल्हा पणन व्यवस्थापक सौरभ ठाकरे आणि जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांनी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यांनी तातडीने नोंदणी करून सरकारी खरेदी केंद्रांचा लाभघ्यावा, असे आवाहन केले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार राबवली जात असून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांनी उत्पादन आणण्यापूर्वी टोकन घेणे आवश्यक असून नियोजित तारखेनुसार धान्याचे वजन करून खरेदी केली जाते. प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीप्रमाणे ठरलेल्या दिवशीच उत्पादन केंद्रावर आणण्याचे आवाहन केले.
विदर्भ सहकारी मार्केटिंग सोसायटी अंतर्गत जिल्ह्यातील ८ सरकारी खरेदी केंद्रांवर हरभरा आणि तूर खरेदी सुरू आहे. या केंद्रांमध्ये अमरावती कृषी बाजार, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, वरुड, मोर्शी, शिंगणापूर (दर्यापूर) आणि मंगरुळ दस्तगीर (धामणगाव रेल्वे) यांचा समावेश आहे. या केंद्रांवर आतापर्यंत २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी हरभरा आणि ३ हजार ६२८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. आजपर्यंत १ हजार ५०० क्विंटल हरभरा आणि १४ हजार ३११ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप
विदर्भ सहकारी मार्केटिंग सोसायटी अंतर्गत ८ सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी आणि खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. येत्या काळात खरेदीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारी सूचनांनुसार शेतकऱ्याऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या बैंक खात्यात दिले जातील, असे मत सौरभ ठाकरे, जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक यांनी व्यक्त केले आहे.






