इतिहास अभ्यासक लेखक जयसिंगराव पवार यांचे निधन झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Jaysingrao Pawar Passes Away : कोल्हापूर : जेष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना आज (दि.26) देवाज्ञा झाली. आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Kolhapur News) जयसिंगराव पवार यांनी इतिहासाच्या साक्षीने भविष्याची सांगड घातली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे समाजामध्ये एक पोकळी निर्माण झाली.
मागील काही दिवसांपासून डॉ जयसिंगराव पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळ जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे इतिहास अभ्यासक, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांचा ‘लेटरबॉम्ब’! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत वर्चस्वाचा नवा संघर्ष
जयसिंगराव पवार हे महाराष्ट्रातील नामांकित इतिहासकार, लेखक आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. मराठा इतिहास, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांच्या लेखनात ऐतिहासिक सत्य, संशोधन आणि तर्कशुद्ध मांडणी यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो.
जयसिंगराव पवार यांनी मराठा साम्राज्य, शिवकालीन घटना आणि विविध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी केवळ इतिहास सांगितला नाही, तर त्यामागील वास्तव आणि संदर्भही स्पष्ट केले. त्यांच्या संशोधनामुळे इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी वाचकांना मिळाली. ते व्याख्यानांद्वारे आणि लेखनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करत होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि निर्भीड मतांमुळे ते नेहमी चर्चेत राहिले.
हे देखील वाचा : नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ
जयसिंगराव पवार यांचे कार्य मराठी इतिहास लेखनात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे मराठा इतिहास अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत झाली. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती संताजी घोरपडे, संभाजी स्मारक ग्रंथ, मराठेशाहीचा मागोवा, मराठी साम्राज्याचा उदयास्त, शिवचरित्र- एक मागोवा, शिवचरित्रापासून काय शिकावे? आणि आमच्या इतिहासाचा शोध व बोध अशी पुस्तके लिहिली आहेत.






