जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीचे कारण सांगितले (फोटो - सोशल मीडिया)
Sangli News : सांगली : खानापूर-आटपाडी व जत तालुक्यात भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक उमेदवार न देण्याची भूमिका घेतली. निवडणूकपूर्व सहकार्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली असून आता राष्ट्रवादी अजितदादा गटासह सर्व भाजपविरोधी सदस्यांनी लोकनिर्णयाचा सन्मान करून आघाडी सोबत यावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक व सत्कार सोहळा पार पडला. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यात आली. (Sangli News)
बैठकीस आमदार रोहित पाटील, मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, “जत, मिरज आणि शिराळा तालुक्यात घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना निवडणूकपूर्व मदत करण्याचा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतला होता. भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश होता. आज त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.” ते पुढे म्हणाले, “ज्या ठिकाणी अपयश आले, तेथे आत्मपरीक्षण करू. परंतु जिथे विजय मिळाला, तेथे जनतेने दिलेल्या कौलाचा आदर राखत लोकाभिमुख कारभार करणे ही आपली प्राथमिकता असेल. सत्ता ही केवळ पदांसाठी नसून विचारांसाठी आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी असते.” अशी भूमिका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी
पुढे आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट केले की, “संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्ही जनतेच्या बळावर उभे राहिलो. सात जागांचा विजय हा संघटनेच्या एकजुटीचा परिणाम आहे.” बैठकीत गटनेतेपदी अॅड. विजय विश्वास धेंडे यांची निवड जाहीर करण्यात आली. जयंत पाटील यांनी नव्या सदस्यांना जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे, पारदर्शक व जबाबदार नेतृत्व देण्याचे आवाहन केले.“शाहू-फुले-आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आधारित जनतेचे राज्य उभारणे, हीच आमची राजकीय दिशा आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधी पर्याय अधिक मजबूत करू,” असे ते शेवटी म्हणाले.
हे देखील वाचा : भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव
भाजपसोबत जाण्याचा वैयक्तिक सल्ला
जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपसोबत जाऊन अध्यक्ष व सभापती पदांची मागणी करावी, असा वैयक्तिक सल्ला दिला. “किती दिवस अडचणीत राहायचे? हे माझे वैयक्तिक मत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले, मात्र त्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी भाऊंचा त्रागा त्रासातून असल्याचे सांगितले, तर जयंत पाटील यांनी काही ठिकाणी आपल्याला आपल्या चुकांमुळे अपयश आल्याने सुरेश पाटील यांनी त्रागा केला आहे, तो योग्य आहे. त्यामुळे यापुढे लोकाभिमुख काम करून सर्वच १८ सदस्यांनी ६१ मतदार संघात काम करण्याचे आवाहन केले.






