संग्रहित फोटो
दरम्यान, बैठकीनंतर महापौरपदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांनी आपापले अर्ज महानगर पालिकेत दाखल केले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ६५ पैकी ४७ जागा जिंकून भाजप महायुतीने सत्तासूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले. त्यामध्ये सर्वाधिक ४३ जागा जिंकल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे निश्चित झाले होते. त्यातच महापौरपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाल्याने तब्बल २७ इच्छुकांमधून संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता वाढली होती.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत ६ फेब्रुवारी असल्याने दोन दिवसांपासून पहिला महापौर कोण? या चर्चेला पुन्हा उधाण आले होते. तर सोशल मिडीयावर महापौरपदी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची निवड झाल्याचे संदेश व्हायरल झाले होते. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, गटनेता विठ्ठल चोपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, स्वप्निल आवाडे शशिकांत मोहिते यांच्या उपस्थितीत पाटील यांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले,
इच्छुकांची संख्या मोठी असली तरी भाजपच्या शिस्तीनुसार स्थानिक नेतेमंडळींसोबत झालेल्या चर्चेतून महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक प्रत्येकी पाच सदस्यांची नावे प्रदेश समितीकडे पाठविण्यात आली होती. त्यामधून महापौरसाठी उदय धातुंडे आणि उपमहापौरसाठी अनिल डाळ्या यांच्या नांवावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगत घोषणा केली.
महापौर, उपमहापौर हे सव्वा वर्षांचेच
नियमानुसार महापौर पद हे अडीच वर्षांसाठीच असते. पण स्थानिक पातळीवर सर्वांना संधी देण्याच्या उद्देशाने त्यासाठी ठराविक कालावधी ठरविला जातो. पण या संदर्भात महत्वाच्या पदावरील व्यक्तीला कामकाज पध्दती समजण्यासह काम करण्याची संधी मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने इचलकरंजी महानगरपालिका महापौरपद हे सव्वा वर्षांसाठीच असणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे महापौर व उपमहापौर हे सव्वा वर्षासाठी कार्यरत राहणार आहेत.
हे सुद्धा वाचा : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
निवडणूक बिनविरोधसाठी आवाहन
चंद्रकांत पाटील यांनी, महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक विरोधकांनी बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कोल्हापूर आणि पुणे महानगरपालिकेचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांना मी आवाहन केले आहे. त्याच पद्धतीने विरोधी आघाडीतील मदन कारंडे यांनी यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. शहराच्या पाच वर्षाच्या विकासासाठी सत्तारुढ आणि विरोधी गट मिळून काम करुन एक वेगळा आदर्श निर्माण करुया, असे पाटील यांनी सांगितले.






