पावसाळ्यात लोकल ट्रेनचा प्रवास राहणार सुसाट! रेल्वे मार्गावरील धोकादायक झाडांवर पालिकेची कुऱ्हाड
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासाला पावसाळ्यात झाडे आणि फांद्या कोसळल्यामुळे दरवर्षी ‘ब्रेक’ लागतो. मात्र, यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी सुकर व्हावा आणि रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनासोबत मिळून रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षांना हटवण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मेच्या मेगाब्लॉकचा फायदा घेत ओव्हरहेड वायर आणि रुळांवर झुकलेल्या तब्बल ६७हजारांहून अधिक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी
पावसाळ्यातील जोरदार वारे, अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे वृक्षांच्या फांद्या तुटून रेल्वे रुळांवर किंवा विद्युत वाहिन्यांवर पडण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवार, ३१ मे रोजी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली.
८८ रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षांचे वेळेत व्यवस्थापन आणि फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात ओव्हरहेड वायर्सवर फांद्या पडून लोकल सेवा खंडित होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही एक महत्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरेल, असे मत
उद्यान विभाग, मुंबई महापालिकेने मांडले आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील ८४ हजार ८१९ वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले होते. त्यापैकी ६७ हजार २७४ वृक्षांची छाटणी झाली असून, उर्वरित १७ हजार १९७ वृक्षांचे पूर्ण काम अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य उद्यान विभागाने ठेवले होते.केवळ झाडांची छाटणीच नव्हे, तर त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने एप्रिल महिन्यात ‘वृक्षसंजीवनी अभियान-३’ राबविले होते. या मोहिमेत ४१४ स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात रेल्वे मार्गालगत आणि शहरात एकूण ३८७ मृत अथवा धोकादायक वृक्ष आढळले होते.त्यापैकी ३६९ वृक्ष आतापर्यंत पूर्णपणे हटविण्यात आले असून, उर्वरित १८ वृक्षांना हटविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. पावसाळा ऋतूला लवकरच सुरुवात होणार आहे. याच पार्शवभूमीवर रेल्वे मार्गातील झाडे आणि पावसाळा पूर्वीच्या कामांना वेग आला आहे.






