मानवतेचा हात, सर्वांचा साथ अभियानाचा शुभारंभ
आदिवासी मुलांसाठी “मानवतेचा हात, सर्वांचा साथ” अभियान
लोढा फाऊंडेशनतर्फे स्तुत्य उपक्रम
अभियानाची सुरुवात पालघर जिल्ह्यापासून करण्यात येणार
मुंबई: लोढा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “मानवतेचा हात, सर्वांचा साथ” या सामाजिक अभियानाचा शुभारंभ मंगळवार, दि. ९ जून रोजी सायंकाळी गामदेवी येथील धरम पॅलेस, ह्यूजेस रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
समाजातील अनेक घरांमध्ये वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या पुस्तक, खेळणी आणि सायकली मोठ्या प्रमाणावर पडून असतात. या वस्तूंना नवजीवन देत त्या आदिवासी समुदायातील गरजू मुले आणि कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या अभियानाद्वारे करण्यात आला आहे. संकलित साहित्याची आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता व पुनर्वापरासाठी तयारी करून ते गरजूंपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये
अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमास १०० हून अधिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांची उपस्थिती.
अभियानाच्या पहिल्या दिवशी ४०० पुस्तके, १०० हून अधिक खेळणी आणि ५० हून अधिक व्यक्तिकडून दान करण्यात आल्या.
आजपासून सुरू झालेले हे अभियान निरंतर स्वरूपात राबविण्यात येणार असून वर्षभर नागरिकांकडून पुस्तके, खेळणी व सायकली संकलित करण्यात येणार आहेत.
अभियानाची सुरुवात पालघर जिल्ह्यापासून करण्यात येणार असून संकलित खेळणी, सायकली आणि पुस्तकांचे वाटप पालघरमधील आदिवासी मुलांमध्ये करण्यात येईल.
समाजातील अनुपयोगी वस्तूंना नवजीवन देत त्या गरजू मुलांच्या शिक्षण, आनंद आणि विकासासाठी वापरण्याचा उपक्रम.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शिक्षणाची साधने, खेळण्यांमधून मिळणारा आनंद आणि सायकलीमुळे निर्माण होणारी गतिशीलता ही ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील अनुपयोगी वस्तू दान करून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “समाजातील प्रत्येक घरात अशी अनेक पुस्तके, खेळणी आणि सायकली असतात ज्या वापरात नसल्या तरी एखाद्या गरजू मुलासाठी त्या अमूल्य ठरू शकतात. ‘मानवतेचा हात, सर्वांचा साथ’ हा उपक्रम केवळ वस्तूंचे दान नसून आनंद, शिक्षण आणि संधींचे वाटप करणारा उपक्रम आहे. पालघरमधील आदिवासी मुलांपासून सुरू होणारी ही चळवळ समाजातील संवेदनशील नागरिकांच्या सहभागातून अधिक व्यापक होईल, असा मला विश्वास आहे.”
मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; ‘हा तर डॉ. कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न’, लोढा यांची टीका
डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “एक जुने पुस्तक एखाद्या मुलाला शिक्षणाची नवी संधी देऊ शकते, एक खेळणे त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवू शकते आणि एक सायकल त्याच्या स्वप्नांना नवे पंख देऊ शकते. समाजातील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.”
कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी क्षेत्रातील अनेक मान्यवर, नागरिक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आदिवासी मुलांच्या शिक्षण, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.लोढा फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना आपल्या घरातील जुनी पुस्तके, खेळणी आणि सायकली दान करून या सामाजिक चळवळीचा भाग बनण्याचे आवाहन करण्यात आले.






