मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार (फोटो- ट्विटर)
मुंबई: विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना घरांचे करारपत्रे यावेळी वितरित करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत आहे. गणपती उत्सवाच्या आधीच रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
वांद्रे पूर्व येथील ३०.१६ एकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन उच्च न्यायालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वांद्रे पूर्व येथील ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या ७७ सदनिका व बालाजी शॉप किपर्स येथील ६७ सदनिका अशा एकूण १४४ सदनिका शासनाकडे पाठपुरावा करुन उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या सदनिका तयार होण्यास सहा ते नऊ महिन्याचा अवधी लागणार असल्याने १०० पात्र झोपडीधारकांने स्वखर्चाने पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची अट नमूद करुन पात्र झोपडीधारकांशी करारनामे करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री आशीष शेलारांनी विधानसभेत दिले निवेदन
राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर म्हणजेच विधानसभा निवडणूक झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळेस अधिवेशनात मंत्री आशीष शेलार बोलत होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी निवेदनात म्हटले की, महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, या वारशाचे जतन व संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तेव्य आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय एक भव्य “राज्य सांस्कृतिक केंद्र” व “राज्य वस्तुसंग्रहालय” राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असणे अभिप्रेत आहे. राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य ऑडिटोरियम, कलादालने व रिसर्च सेंटर इत्यादी बाबी नियोजित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी राज्य सांस्कृतिक केंद्र हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असेल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारंसाठी एक व्यासपीठ म्हणून हे केंद्र कार्यरत असणार आहे.
Ashish Shelar: “मुंबईत राज्याचे भव्य…”; मंत्री आशीष शेलारांनी विधानसभेत दिले निवेदन
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची आणि राज्य वस्तुसंग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता आहे. त्यानुषंगाने, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे- कुर्ला संकुलात अधिसूचीत क्षेत्रात समाविष्ट असलेला मौजे वांद्रे सर्वें नंबर ३८१ न.भु.क्र., ६२९ (पै) येथील १४,४१८ चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागास विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल व त्या ठिकाणी भव्य असे राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली.