वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत
Mumbai Bandra Demolition News Marathi : मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला काल म्हणजे 20 मे 2026 रोजी हिंसक वळण लागल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर कारवाई सुरू असताना काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 15 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली होती. या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही रहिवासी आणि समाजकंटकांकडून विरोध सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवत 15 जणांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियोजनानुसार सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार केली जात आहे. रहिवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी, त्यांना त्यांची घरे आगाऊ रिकामी करण्यासाठी वेळ दिला जात आहे. आतापर्यंत अंदाजे ६०% कारवाई पूर्ण झाली आहे. एकूण ५०० बेकायदेशीर बांधकामांपैकी, अंदाजे ३०० घरे आणि इतर बांधकामे पाडण्यात आली आहेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी, या कारवाईदरम्यान तैनात असलेल्या यंत्रसामग्रीची संख्याही वाढवण्यात आली आहे.
आरपीएफ – २५०
जीआरपी – २००
मुंबई पोलीस – ५००
रेल्वे कर्मचारी – २५०
एकूण – १२००
कारवाईदरम्यान, अनेक स्थानिकांनी निषेधार्थ रस्त्यावर उतरून निदर्शने केली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, काही लोकांनी पोलिसांवर पाणी आणि बादल्याही फेकल्या. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. परिसरातील महिला आणि वृद्ध लोकांनीही प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला. अनेक महिला पोलिसांप्रति आक्रमक दिसल्या. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते गरीब नगरमधील जमीन रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक आहे. भविष्यात तिथे रेल्वे विस्तार, अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स, एकात्मिक रेल्वे संकुल आणि इतर विकासकामे केली जातील. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहील.
Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह






