महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक ४३९८ दिवस पंतप्रधानपदी राहणाचा विक्रम केल्याबद्दल शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पार पडेलल्या ‘एनडीए’च्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडला. मोदीजींच्या नेतृत्वात भारताची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली. मोदीजींचे देशसेवेचे १२ वर्षांचे एक तप पूर्ण झाले, आता पुढील २१ वर्षांसाठी विकसित भारताची संकल्पना मांडून त्यांची देशाप्रति असलेली दूरदृष्टी आणि कटिबद्धता दिसून आली, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांविषयी काढले.
तत्पूर्वी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारताच्या इतिहासात निवडून येऊन सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा विक्रम आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केला. त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडीत काढला. पंतप्रधान मोदीजी यांनी केवळ विक्रम मोडला नाही तर भारताला जगभरात नावलौकिक मिळवून दिला. पंतप्रधानांच्या नेतृत्वात जगभरात भारताचा डंका वाजला आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय. अकराव्या क्रमांवर असलेली भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान मोदीजी यांनी केले. आता त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प केलाय, असे ते म्हणाले. मागील १२ वर्षांत केवळ भारताच नव्हे तर जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून मोदीजींनी ओळख निर्माण केली. तब्बल ३३ देशांनी मोदीजींचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला. मोदीजींच्या कणखर नेतृत्वाचा आणि अविरत देशसेवेचा भारतीयांना अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दिर्घायुष्य लाभावं आणि देशसेवेसाठी अधिक बळ मिळावे, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि आताही कोस्टल रोड, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी मिळाला. ते पुढे म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटींचा निधी मिळाला होता, मात्र मागील १२ वर्षात पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्रातील पायाभूत सेवा प्रकल्पांसाठी १० लाख कोटींचा निधी दिला. महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान मोदीजींचा सिंहाचा वाटा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. जनधन योजनेतून ५० कोटी खाती सुरु झाली, पायाभूत सुविधांचा विकास, महिलांना आत्मनिर्भर केलं, ३२ कोटी गरिबांना द्रारिद्र्यरेषेवर आणण्याचे काम पंतप्रधान मोदीजींनी केले. आजही ८० कोटी लोकांना दरमहा अन्नधान्य दिले जात आहे. त्यांनी सोमनाथ मंदीर, वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदीराचा पुनर्विकास करुन विकास आणि वारसा यांचा समतोल साधून पंतप्रधान मोदीजींनी देशाला पुढे नेण्याचे काम केलं, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राममंदीर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले. तसेच काश्मिरमधील कलम ३७० रद्द करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान मोदीजी यांनी घेतला. ऑपरेशन सिंदूरमधून पंतप्रधानांनी पाकिस्तानचा चोख उत्तर दिलं. लष्कराला कारवाईसाठी मोकळीक दिली आणि पाकिस्तानात जाऊन कारवाई केली. नव्या भारताच्या कणखर नेतृत्वातून शत्रू राष्ट्राला कडक इशारा दिला. शेतकरी विरोधी टॅरिफबाबत ट्रम्प यांचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. कोणत्याही दबावाला बळी न पडता पंतप्रधान मोदीजी यांनी देशहित प्रथम ही भूमिका घेतली. गरिब कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदीजींशी कौटुंबिक नातं
शिवसेना हा ‘एनडीए’मधील भाजपचा सर्वात जुना आणि विश्वासू घटक पक्ष आहे. मात्र एक कुटुंब प्रमुख म्हणून आणि कौटुंबिक नातं जपण्याचे काम पंतप्रधान मोदीजी यांनी केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर पंतप्रधानांनी आपली आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. निवडणूक प्रचारात अनेकदा त्यांनी आपल्या आवाजाविषयी काळजी व्यक्त केल्याची आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशात शिष्टमंडळाचे प्रतिनिधीत्व केले, तेव्हाही डॉ. श्रीकांत विषयी पंतप्रधानांनी आपुलकीने विचारपूस केली होती. छोट्या रुद्रांशशी पंतप्रधानांचा विशेष लगाव आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काही लोकांच्या स्वार्थामुळे शिवसेना ‘एनडीए’पासून दूरावली होती
सत्तेसाठी व स्वार्थासाठी बाळासाहेबांना नको असलेला मार्ग काही लोकांनी निवडला तेव्हा शिवसेना मधल्या काळात ‘एनडीए’सोबत शिवसेना दुरावली होती, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मात्र बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि पुन्हा शिवसेना एनडीएसोबत आली. महाराष्ट्रातल्या मनातलं युतीचे सरकार आणले. शिवसेना आणि ‘एनडीए’ हे नातं अतूट आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.






