नवी मुंबई विमानतळावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण; दि. बा. पाटील यांचेच नाव कायम राहणार; फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे महत्त्व अधोरेखित करत, विमानतळावर उभारलेला हा पुतळा राज्याच्या अभिमानाचे प्रतीक ठरेल, असे सांगितले. आधुनिक पायाभूत सुविधांसोबत इतिहासाची जोड देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केली. विमानतळाला दिवंगत नेते D. B. Patil यांचेच नाव कायम ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाव बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठरलेले आहे. केंद्र सरकारकडे त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच हे नामकरण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणामुळे या प्रकल्पाला सांस्कृतिक आणि भावनिक अधोरेखन मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षणांची आठवण करून देणारा असून ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. शतकानुशतके स्वराज्याच्या विचारांना प्रेरणा देणारा हा दिवस दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो.
डी. बी. पाटील कोण होते?
राजकीय कारकिर्दीत त्यांनी पाच वेळा आमदार, एकदा विधान परिषदेचे सदस्य आणि दोन वेळा खासदार म्हणून काम केले. त्यांनी एकदा कुलाबा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आणि एकदा शहर अध्यक्ष म्हणूनही काम केले. ते पनवेलमधून पाच वेळा आमदार होते, तसेच कुलाबा येथून खासदार म्हणूनही निवडून आले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (NMIA) दिवंगत डी. बी. पाटील, उर्फ दिंका बाळू पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळाला त्यांचे नाव देण्यासाठी पक्षांनी मोहीम चालवली होती, जी यशस्वी झाली. नवीन विमानतळाला शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचीही मागणी होती, परंतु अखेरीस डी. बी. पाटील यांचे नाव निवडण्यात आले.






