'भारताला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले'; मुख्यमंत्र्यांचं गौरोद्गार (Photo Credit- X)
मुंबई : देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एवढेच नाही तर देशात ‘मेक इन इंडिया’ ही चळवळ राबवून ‘मेक फॉर वर्ल्ड’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिले आहे. ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे, त्याला जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.२६) पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे. या ऐतिहासिक पर्वानिमित्त ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मागील 12 वर्षांत केलेले कार्य खूप मोठे आहे. एका पुस्तकात ते कार्य मांडणे खूप कठीण काम आहे. देशातील तळागाळातील शेवटच्या माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोदींजींनी सतत प्रयत्न केले. हर घर शौचालय, उज्वला गॅस योजना यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या. सरकारच्या अनुदानावर जनतेला न ठेवता गरीब केंद्रित अजेंडा त्यांनी राबवला. त्याचाच परिणाम म्हणून मागील 10 वर्षांत 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले.
भारताच्या जीडीपीतही वाढ
भारताचा GDP 2013-14 मध्ये 103 लाख कोटी होता तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच तिप्पट वाढवला. महाराष्ट्राचा GDP 2013-14 मध्ये 13 लाख कोटी इतका होता तो 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढवला. हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. पंतप्रधान मोदींजींचे 12 वर्षांत केलेला देशाचा विकास हा फक्त घोषणांनी झालेला नाही, तर त्यामागे त्यांची विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीती हे मुख्य कारण आहे.
पंतप्रधान मोदींनी नव्या राष्ट्रशक्तीचा केला आदर्श उभा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने केवळ विकास केला नाही, तर जगासमोर एका नव्या राष्ट्रशक्तीचा आदर्श उभा केला आहे. आजचा भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा, डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम झालेला, उद्योगशील आणि नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जात आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले.
“राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” म्हणजे खरंतर देशाच्या जनतेने अनुभवलेला परिवर्तनाचा इतिहास आहे, असे सांगत रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे. शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था मोदी सरकारने निर्माण केली.






