पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन (Photo Credit- X)
Navi Mumbai Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन झाले आहे. या उद्घाटनामुळे नवी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) नागरिकांचे हक्काचे विमानतळ आजपासून सेवेत आले आहे. विमानतळाच्या उद्घाटनामुळे मुंबईवर असलेला हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. NMIA चे उद्घाटन आज झाले असले तरी, ते लगेचच पूर्ण क्षमतेनं सेवेत येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना या विमानतळाची पूर्ण सेवा डिसेंबर महिन्यापासून उपलब्ध होईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.
#WATCH | Navi Mumbai, Maharashtra | Prime Minister Narendra Modi inaugurates Phase 1 of the Navi Mumbai International Airport, built at a cost of around Rs 19,650 crore. (Source: DD News) pic.twitter.com/6kSxFSHNgB — ANI (@ANI) October 8, 2025
नवी मुंबईतील उलवे जवळील सुमारे २,८६६ एकर जागेवर पसरलेले हे विमानतळ केवळ एक विमानतळ नाही तर मुंबईकर गेल्या २५ वर्षांपासून ज्याचे स्वप्न पाहत आहेत ते वास्तव आहे. हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, जो आता प्रत्यक्षात आला आहे. हा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी) आणि सिडको (महाराष्ट्र अर्बन अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचा ७४ टक्के आणि सिडकोचा २६ टक्के हिस्सा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवी मुंबई विमानतळ हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) प्रचंड ताण कमी करण्याच्या उद्देशाने बांधलेले हे नवीन विमानतळ राज्याला आर्थिक विकासाची नवी गती देईल. त्याचसोबत, मोठ्या गुंतवणुका आकर्षित करेल आणि राज्यभरातील पायाभूत सुविधांना चालना देईल, अशी अपेक्षा आहे. हे विमानतळ महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक विकासाचे नवे प्रतीक म्हणून उदयास येत आहे.
नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला देणार नवी दिशा; पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती
एनएमआयएची आर्थिक क्षमता केवळ तिकीट काउंटर किंवा बॅगेज बेल्टपुरती मर्यादित नाही. एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची अपेक्षा आहे, जी मुंबईच्या सध्याच्या विमानतळाच्या क्षमतेच्या जवळपास दुप्पट आहे. यामुळे ग्राऊंड स्टाफ, हॉस्पिटॅलिटी, लॉजिस्टिक्स आणि रिटेल अशा विविध क्षेत्रांत हजारो नवीन रोजगार निर्माण होतील. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या अहवालानुसार, विमान वाहतूक कनेक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक १ टक्के वाढ ही देशाच्या जीडीपीमध्ये ०.५ टक्के वाढ करते. त्यामुळे, नवी मुंबई जागतिक विमान वाहतुकीच्या नकाशावर आल्यावर महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
याशिवाय, हे विमानतळ नवी मुंबईमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढवेल. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) मध्ये रिअल इस्टेट, वेअरहाऊसिंग, आयटी पार्क आणि व्यावसायिक विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (FDI) आणि खाजगी गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि लोअर परळसारख्या व्यावसायिक केंद्रांना थेट टक्कर देईल.