नांदेड-बिदर रेल्वेमार्गाचे केवळ आश्वासन प्रत्यक्षात नाहीच (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : निवृत्ती भागवत : देगलूर : नांदेड ते बिदर हा सुमारे १७५-२०० किलोमीटरचा अंतराचा प्रस्तावित रेल्वे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे; मात्र प्रत्यक्षात आजही तो केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. या मार्गाचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत पुढे केला जातो, आंदोलने होतात, मागण्या केल्या जातात; पण प्रत्यक्ष काम मात्र सुरू होत नाही. त्यामुळे हा विषय खरोखरच जनतेच्या विकासाचा आहे की केवळ राजकीय फायद्यासाठी वापरला जाणारा मुद्दा आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
रेल्वे विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?
नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे मार्गासाठी विविध स्तरावर अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या. राजकीय नेते, अनेक सामाजिक नेते-कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, शेतकरी गट तसेच विद्यार्थी संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली, रेल्वे मंत्र्यांसह गृहमंत्री, पंतप्रधानांच्या देखील भेटी घेतल्या. मोर्चे काढले, रास्ता रोको आंदोलन केले. काहीवेळा सर्वपक्षीय नेतेही एकत्र येऊन या मागणीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसले. मात्र या सर्व आंदोलनांचा परिणाम केवळ कागदोपत्री राहिला. ठोस निर्णय, निधी मंजुरी किंवा कामाची सुरुवात यापैकी काहीही प्रत्यक्षात दिसून आले नाही.
हे देखील वाचा : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
शीख भाविकांसाठी मोठा दिलासा
नांदेड हे शीख धर्मियांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे, कारण येथे हजूर साहिब गुरुद्वारा आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो शीख भाविक येथे दर्शनासाठी येतात. दुसरीकडे कर्नाटकातील गुरुद्वारा नानक झिरा साहिब हेही एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. जर नांदेड-बिदर रेल्वे मार्ग सुरू झाला, तर पंजाबमधून येणाऱ्या भाविकांना थेट रेल्वेने बिदरपर्यंत पोहोचणे सोपे होईल. सध्या त्यांना अनेक ठिकाणी बदल करावे लागतात किंवा रस्त्याने त्रासदायक प्रवास करावा लागती, या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळेल, पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल,
राजकारणाचा खेळ : आश्वासनांची मालिका
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. विविध पक्षांचे नेते सत्तेत असताना हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले, पण विरोधात असताना याच मुद्द्यावर आंदोलन करताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीतः रेल्वे मार्ग मंजूर करू” अशी घोषणा जनतेसमोर मोठमोठी आश्वासने निवडणूक संपल्यानंतर विषय विस्मरणात जातात.
ही पद्धत आता जनतेच्या लक्षात आली आहे. विकासाच्या नावाखाली केवळ मतांसाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचा आरोप सर्वसामान्य लोक करत आहेत. या प्रश्नात केंद्र आणि राज्य सरकार दोन्हींची भूमिका महत्त्वाची आहे.
हे देखील वाचा : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर
खराब रस्ते आणि जनतेची गैरसोय
सध्या नांदेड-देगलूर-बिदर हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. साडेतीन ते चार तासांचा प्रवास चार ते पाच तासांपर्यंत वाढतो.
प्रवाशांना खड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून अक्षरशः धक्के खात प्रवास करावा लागतो. याचा परिणाम केवळ वेळेवरच नाही, तर आरोग्यावर, वाहनांच्या खर्चावर आणि एकूणच जीवनमानावरही होत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे मार्ग हा पर्याय नसून गरज बनली आहे.






