पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड पुढील आदेशापर्यंत बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यान काही भागांत सुमारे 300 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा.
सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुगारवाडी धबधबा, हरिहर गड तसेच इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. ही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहू शकते. तसेच, त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवारी भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिरात येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सप्तशृंगी देवस्थान देखील अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे बंद ठेवण्यात येणार असून, यात्रेकरूंनी प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार स्थलांतराची तयारीही करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी, धबधबे, घाटरस्ते आणि डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद






