संग्रहित फोटो
सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असून, शेतकऱ्यांकडून अंतिम संमती घेवून त्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत. मात्र याच प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे पुन्हा वसूल केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही शेतकऱ्यांना तर जादा पैसे दिल्याचे कारण सांगून पुन्हा व्याजासह वसूल केल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरु आहेत. भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसून अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे, असे दिसून येत आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. आता शेतकऱ्यांच्या जमिनीची संमती घेवून त्यांना त्यांच्या क्षेत्राचे त्यातील विविध बांधकामे, इतर गोष्टींचे नुकसानापोटी एकरकमी परतावा देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माहिती घेवून आणि खात्री झाल्यानंतर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.
मे महिन्यात शेतकऱ्यांच्या संमती घेण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला १० जूनपर्यंत स्वच्छेने परवानगी देणाऱ्यांना प्राधान्य राहील, अशा आशयाची नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनीची संमती दिली आहे. आपापसातील भाऊबंदकीतील वाद तसेच कौटुंबिक वाद मिटविण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करून संमती देण्यास सुरुवात केल्याने पहिल्या काही दिवसातच संमती देणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी वाढली.
मागील आठवड्यात जवळपास ६० टक्के संमती मिळाल्याने अधिकाऱ्यांनी शासनाला कळवले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबत चिंताही व्यक्त केली. काही गावच्या सरपंचानी तर एकीकडे विरोधाची भूमिका घेत दुसरीकडे १० जूनची मुदत संपत असल्याचे लक्षात येताच लेखी पत्राद्वारे एक महिन्याची मुदतवाढ देखील मागितली. आणि तसे पत्र सोशेल मिडीयावर व्हायरल करीत शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.
मात्र या प्रक्रिया दरम्यान भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली जात असल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना लाभ दिला असला तरी ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मोठे आहे, अशा शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची वसुली केली जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. काही शेतकऱ्यांना तुमचा पूर्वीचा सर्व्हे चुकला असून परताव्याची रक्कम जादा लागली आहे, पुन्हा सर्व्हे करून घ्या असे सांगून काही कोटींची रक्कम पुन्हा वसूल केली जात आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यावर त्यांची खातीच बंद केली असून त्यांना बँकेतील पैसे काढण्यास मनाई केली असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत; आषाढी वारीपूर्वी पर्यावरणीय संकट
भूसंपादनाचे क्षेत्र आणि पैसे वाटपातील आकड्यात मोठी तफावत
एकीकडे ७० ते ८० टक्के क्षेत्राला शेतकऱ्यांच्या संमती मिळाल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. ३ हजार एकर साठी सहा हजार कोटींची सोय केल्याचे शासन सांगत आहे, मात्र ७० टक्के क्षेत्रासाठी केवळ ९०० कोटी वाटप हा विचार करायला लावणारा आकडा आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संमती घेवूनही त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत, केवळ संमतीची आकडेवारी वाढवली असल्याने पैसे न मिळाल्याने शेतकरी अधिकारी यांच्याकडे आताच हेलपाटे मारीत असल्याचे चित्र पुरंदरच्या तहसील कार्यालयात दिसून येत आहे.
हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली






