सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या उष्म्याचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसण्याची भीती असून, जनावरांमध्ये उष्माघात, दूध उत्पादनातील घट आणि निर्जलीकरणासारख्या समस्या उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, पशुधनाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
कडक उन्हामुळे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामध्ये प्रामुख्याने जनावरांची भूक मंदावणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (निर्जलीकरण) आणि गंभीर परिस्थितीत मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनावरही याचा मोठा परिणाम दिसून येतो. हे टाळण्यासाठी पशुपालकांनी वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.
पाणी आणि आहार व्यवस्थापन
उन्हाळ्यात जनावरांना दिवसभर मुबलक, स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात आणि शक्य असल्यास पिण्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट किंवा खनिज मिश्रणांचा वापर करावा. आहाराच्या बाबतीत बदल करताना, दुपारी कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. त्याऐवजी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. आहारात मीठ आणि खनिज मिश्रणाचा संतुलित वापर करावा, जेणेकरून जनावरांची प्रतिकारशक्ती टिकून राहील.
गोठ्यातील वातावरण आणि थंडावा
जनावरांना थेट उन्हात बांधणे टाळावे. गोठ्यांवर शेडनेट, गवताचे आच्छादन किंवा ताडपत्रीचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवावे. गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. दुपारी उष्णतेची तीव्रता जास्त असताना जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा गोठ्यात पंखे, फॉगर्सचा वापर करावा. विशेषतः म्हशींना पाण्यात बसण्याची सोय असल्यास ती फायदेशीर ठरेल.
वाहतुकीवर मर्यादा
उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता, सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जनावरांची कोणत्याही प्रकारची वाहतूक करू नये. बाजार, स्पर्धा किंवा लांब अंतराची ने-आण केवळ सकाळी किंवा संध्याकाळीच करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कुक्कुटपालनासाठी खबरदारी
पोल्ट्री व्यवसायालाही उन्हाचा मोठा तडाखा बसतो. त्यामुळे शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे, पक्षांना थंड पाणी द्यावे आणि शेडमध्ये पक्षांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
“उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. जनावरांना धाप लागणे, जास्त लाळ येणे, सुस्ती येणे किंवा शरीराचे तापमान वाढणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.” — डॉ. विष्णू गर्जे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग






