कांदा उत्पादकांना दिलासा! बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना मिळाला आधार
रांजणी : सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने आंबेगाव तालुका आणि परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षेपेक्षा चांगला मोबदला मिळत आहे.
मंचर बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला सुमारे २५०० ते ३००० प्रति क्विंटलपर्यंत तर नारायणगाव बाजार समितीतही दर्जेदार कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. यंदा उत्पादन खर्चात वाढ, मजुरी, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, सध्याच्या बाजारभावामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, उत्पादन खर्च वसूल होण्यास मदत होत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांच्या मते, दर्जेदार कांद्याला बाजारात चांगली मागणी असून, पुढील काही दिवस आवक आणि मागणी यावर बाजारभाव अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार आणि निवड केलेला माल बाजारात आणल्यास अधिक चांगला दर मिळू शकतो. दरम्यान, बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकरी आशावादी असून आगामी काळातही बाजारभाव स्थिर राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याला चांगला आणि समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात खर्च वजा जाता दोन रुपये राहतील त्यामुळे साहजिकच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कांदा विक्रीमुळे कमी होईल. हा बाजारभाव असाच टिकुन राहिल्यास यंदा शेतकरी वर्ग खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.
दरात वाढ झाली असली तरी…
आळेफाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुय्यम बाजार आवारात झालेल्या कांदा लिलावात मागील बाजाराच्या तुलनेत दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरात वाढ झाली असली तरी ती फार मोठी नसून शेतकऱ्यांना केवळ काहीसा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Onion Market News : आळेफाटा बाजारात कांद्याच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा






