मुंबई : ‘पंतप्रधान (PM) मोदी (Modi) हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत,” असं आश्चर्यकारक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. “ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा गैरवापर होत नाही. मोदींच्या जागी मी असतो तरी मी ही असाच वागलो असतो,” असेही ते म्हणाले आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाशी युती केल्यानंतर त्यांच्या या प्रकारच्या विधानांमुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आयकर विभाग, ईडी यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही. ते जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून करत आहेत. सत्ता राखण्यासाठी त्यांना जे आवश्यक आहे ते सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांच्या जागी मी असतो, म्हणजेच जर मी नरेंद्र मोदी असतो तर मी देखील हेच केलं असतं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची खुर्ची हवीच आहे. कायदेशीर मार्गाने ती वाचवणं यात काहीही चुकीचं नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. कुणीही सत्ता राखण्यासाठी तेच करतं जे आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही समोरच्याला आव्हान देऊ शकता. पण तुम्ही तसे नसाल तर काहीच करता येणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर मी जाऊ शकतो
मला उद्या भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर मी जाऊ शकतो. एक तर माझा पक्ष मला अडवू शकतो किंवा माझे कुटुंबीय मला अडवू शकतात. तिसरी अशी कुणीच व्यक्ती नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
भाजपा किंवा संघाने या प्रश्नाचं उत्तर द्यावं
सामान्य माणसांनी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की २०१२ पासून काही षडयंत्रं सुरू आहेत. पक्षांमध्ये भांडणं लावली जात आहेत असं माझं निरीक्षण आहे. एक लक्षात घ्या माणसाचा भरवसा नसतो. भाजपा किंवा संघाने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. माझी इच्छा नाही की असं व्हावं पण उदाहरण म्हणून घ्या की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या काही झालं? तर पुढचा पंतप्रधान कोण असेल हे सांगतील का? त्यांना सांगता येणार नाही. अशात आमच्याकडे विचाराल की पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? आमच्याकडेही कुणालाही सांगता येणार नाही.
विरोधकांत फूट पाडण्याचा प्रयत्न मोदींकडून केला जातोय
एक लक्षात घ्या भाजपाला ती प्रत्येक संधी हवी आहे ज्या ठिकाणी त्यांना फूट पाडता येईल. भाजपाकडून जे काही केलं जातं आहे ते काही चुकीचं नाही. राजकीय खेळाचा तो एक भाग आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मी पाहात आलो आहे की सत्ता आली की सत्तेवर येणारा पक्ष असंच वागत असतो. राजकारणात किंतू-परंतू यांना काहीही अर्थ नसतो. असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. विरोधक एकत्र आले तर ते खुर्चीखाली आग लावतील हे सत्य आहे. मग पंतप्रधान म्हणून मी हे का करू देऊ? विरोधकांना दूर ठेवण्याचा त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न मोदींकडून केला जातो आहे. मला यात काहीही चुकीचं वाटत नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच मी माझी प्रांजळ मतं मांडतच राहणार असंही त्यांनी म्हटलं आहे.