वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार (Photo Credit - X)
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्यात वकील हे न्यायव्यवस्थेचे अविभाज्य घटक असून कायद्याचा अर्थ लावून न्यायदान करण्याच्या प्रक्रियेत ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. अलिकडच्या काळात वकिलांवर पोलीस ठाण्यात हल्ला होणे, सार्वजनिक ठिकाणी शारीरिक व मानसिक हल्ले होणे, धमक्या मिळणे, पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येणे आदी घटनांमुळे न्यायव्यवस्थेचे संरक्षण करणाऱ्या वकिलांचे संरक्षण व सुरक्षितता धोक्यात आली आहे.
आ. सुनील प्रभू यांनी अशासकीय विधेयक सादर केले आहे
अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येऊन नागरिकांचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वकिलांच्या संरक्षणासाठी भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी आ. सुनील प्रभू यांनी अशासकीय विधेयक सादर केले आहे.
हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक
या विधेयकामुळे वकिलांना कायदेशीर सुरक्षा प्राप्त होऊन दिलासा मिळणार असल्याने राज्यातील वकील संघटनानी आमदार सुनिल प्रभु यांचे विशेष आभार मानले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी ०६.११.२०२५ रोजी महाराष्ट्र विधान सभेत अशासकीय विधेयक सादर केले आहे. आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हे विधेयक माननीय अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वकिलांवरील हल्ल्याबाबत शिक्षेची तरतूद व्हावी
वकिलावर होणारे हल्ले गंभीर व अजामिनपात्र गुन्हा घोषित करून त्यासाठी किमान दोन वर्षांपासून ते कमाल सात वर्षे शिक्षा आणि मृत्यू झाल्यास भारतीय संहितेनुसार आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात वकिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. या अशासकीय विधेयक सभागृहाने स्वीकृत करून त्याचे अधिनियमात रूपांतरित करून अंमलबजावणी करावी, अशी आमदार सुनील प्रभू यांनी अशासकीय विधेयकाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे.






