BJP Leader Kirit Somaiya : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, त्यातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह एनडीएत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चौकशा थंडावल्या. आता रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे.
सहा मतदारसंघातील महायुती
मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रचाराला वेग येण्यास सुरुवात होत आहे. शिवसेना शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव, उत्तर पश्चिम लोकसभेसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून शिवसेना आणि खासकरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले जात आहे.
ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
किरीट सोमय्या यांनी भूतकाळात ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या नेत्यांना विजयी करण्यासाठी आता त्यांना प्रचार करावा लागणार आहे. यावर आता किरीट सोमय्या यांनीच स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
प्रसिद्ध वृत्तवाहिनीसोबत बोलताना बोलत असताना किरीट सोमय्या यांना यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते चांगलेच खवळले. ते म्हणाले, हा प्रश्न मला विचारता, पण उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांना हा प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवा. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आम्ही मतदान मागणार आहोत. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नंदकिशोर चतुर्वैदीकडून आलेले २०० कोटी कुठे गेले? हे सांगावे.