राजापूर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजापूरात आले होते. राजापूर शहरातील राजीव गांधी मैदानावर पार पडलेल्या या प्रचार सभेसाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रिय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि महायुतीतील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
यावेळी सभेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळचे मतदान हे भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्वाचे आहे असे सांगितले. यावेळी तुमच्यासमोर दोनच पर्याय आहेत एक नरेंद्र मोदी तर दुसरा राहुल गांधी. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच जागा आहे तर मोदींचे इंजिन सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे कोकणाच्या भविष्यासाठी राणे मोदी हे कॉंबिनेशन खुप महत्वाचे आहे. राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि कोकण असतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथील सभे दरम्यान केले.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही निवडणुक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. लोकसभेची ही निवडणुक कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद याची निवडणुक नाही तर देशाला कोण पुढील पाच वर्ष सुरक्षित ठेवु शकतो हे ठरवण्याची आहे. त्यामुळे जान है तो जहा है यासाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे मत फडणवीस यानी मांडले. गेल्या दहा वर्षाच्या काळात मोदी पंतप्रधान असताना त्यानी केलेल्या सर्व विकासात्मक कामांचा आढावा त्यानी यावेळी घेतला. अर्थव्यवस्था मोठी झाली तर संधी तयार होतात आणि संधी तयार झाल्या कि आपोआप उद्योग येतात असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
गेल्या दहा वर्षात मोदींनी देश बदलला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन मोदी पुढे चालत आहेत. बारा बलुतेदारांसाठी योजना आणली व त्यांचा विकास बळकट केला. कोविडनंतर पुढची फक्टरी ऑफ वर्ल्ड फक्त भारत असल्याचे सगळे जग मानते आहे. आज जगाच्या आशा भारताकडे आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी पंतप्रधान बनने हे देशहिताचे आहे. मोदीना मत देण्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणेना मत द्या. राणे मोदींसोबत असतील तर कोकणच्या विकासासाठी निधी आणतील आणि कोकणचा विकास दुप्पट वेगाने होईल. राणे मोदी हेच कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन आहे असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
२०१९ नंतर पाकिस्तानची भारताकडे डोळेवर करुन पहायची एकदाही हिम्मत झाली नाही. आता देशात एकही बॉम्बस्फोट होत नाही. मोदीनी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आज आपल्या देशाकडे सात किलोमीटरवर लपलेल्या शत्रूचे तळ उध्दवस्त करण्याचे सामर्थ्य असणारे क्षेपणास्त्र आहे. अशी क्षमता फक्त अमेरिका व चायनाकडेच होती. मात्र आता मोदींनी देशाला पुढे नेले असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आज देशात औदयोगिक राज्य म्हणुन ओळखले जात असुन गेल्या दोन वर्षात पुन्हा महाराष्ट्र देशात औद्योगिक क्षेत्रात एक नंबरवर आहे. हे केवळ महाराष्ट्र मोदींबरोबर असल्यामुळे शक्य आहे. आता राज्यात वसुली सरकार नाही तर विकासाचे सरकार आहे. मागचे अडिच वर्षाचे सरकार वसुली सरकार होते अशी टिका त्यानी यावेळी आपल्या भाषणात केली.