"स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं..." प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने स्त्रीने टिकली लावण्याविषयी मांडलं परखड मत
‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. अनेकदा टीआरपी चार्टमध्ये कायमच अव्वल स्थानावर राहिलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अरूंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारलेल्या राधिका देशपांडेने आपली लिलया भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीतील तिच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने स्त्रीने टिकली लावण्याविषयी आपलं परखड मत मांडलं आहे. मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, “एकदा मिरजेला ‘नथुराम गोडसे’नाटकाचा प्रयोग होता. त्यामुळे तिथे माझी भिडे काकांसोबत भेट झाली. साहजिकच मला फोटो काढावासा वाटला. मी फोटो काढला आणि तो ठेवला होता. तो मी काही लगेच पोस्ट केला नाही. त्याच दरम्यान टिकलीवर काहीतरी घाव घालण्यात आला. भिडे काकांवर बोललं गेलं की, त्यांनी एका पत्रकार महिलेला सांगितलं की, तू टिकली लावून ये मग मी बोलेन. आता ते कोणत्या दृष्टीकोनातून बोलले मला काहीच माहिती नाहीये. टिकली लावायची का नाही लावायची? कधी लावायची का नाहीच लावायची? याविषयावर प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं. कुंकवाला पर्याय म्हणून आपण टिकली लावायला लागलो.”
मुलाखतीत पुढे राधिका देशपांडे म्हणाली, “पण, मला भिडे काका असं बोलले, याचा खूप विचार करावासा वाटला. ते का बोलले असतील? मग खरंच ते बरोबर आहे का? आपण आपली संस्कृती सोडतो आहोत का टिकली लावली नाही तर?…मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी जाण्याचा एक डेकोरम (Decorum) असतो प्रोटोकॉल असतो. मला वाटतं टिकली लावायला पाहिजे. न लावून फार असे तुम्ही ग्रेट आहात असं दाखवत असाल तर ते तसं नाहीये. टिकली लावणाऱ्या बायका पण अतिशय सुंदर, आकर्षक असतात.”
हे देखील वाचा – पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या ‘ढाई आखर’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार मंत्रालयात गेल्या होत्या. त्यावेळी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते. म्हणून त्या महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना विचारलं की, तुम्ही कुणाची भेट घेतली? यावर संभाजी भिडे म्हणाले होते की, “तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू किंवा टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन.” संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र गदारोळ झाला होता.