(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला आणि प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भूत बंगला’ हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान, अक्षय कुमारने हा चित्रपट ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa) पेक्षा कशा प्रकारे वेगळा आहे, हे स्पष्ट केले. यावेळी अक्षयने २००७ मध्ये ‘भूल भुलैया’ पाहिल्यानंतर आपल्या मुलाने काय प्रतिक्रिया दिली होती, याविषयीचा एक किस्साही सांगितला.
हिंदुस्तान टाइम्सशी नुकत्याच झालेल्या मुलाखतीनुसार, अक्षयने हा खुलासा केला की त्याच्या मुलाला सलग सहा वर्षे विद्या बालनची भीती वाटत होती. ‘भूल भुलैया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आरवने विद्या बालनबद्दल काय समज झाला होता तो स्पष्ट केला. ‘भूत बंगला’ आणि ‘भूल भुलैया’ यांमधील फरक स्पष्ट करताना अक्षय कुमार म्हणाला, “भूत बंगला हा एक ‘हॉरर-फँटसी’ चित्रपट आहे; तो एखाद्या ‘डिस्नी’ चित्रपटासारखा आहे. दुसरीकडे, ‘भूल भुलैया’ हा एक ‘सायकोलॉजिकल थ्रिलर’ चित्रपट होता. त्या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला असं वाटते की एखाद्या आत्म्याने पात्राच्या शरीराचा ताबा घेतला आहे, पण नंतर तो एक मानसिक आजार असल्याचे उघड झालं होतं. मात्र, ‘भूत बंगला’बद्दल बोलायचे झाल्यास, ‘वधूसुर’ची निर्मिती कशी झाली आणि त्याच्या कृत्यांमागील कारणे नेमकी काय होती, हे चित्रित केलं आहे.”
नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूदरम्यान, अक्षय कुमारने सांगितले की, ‘भूल भुलैया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा मुलगा आरवला तब्बल सहा वर्षे विद्या बालनची भीती वाटत होती. तो संपूर्ण किस्सा सांगताना म्हणाला, “मी माझा मुलगा आरवशी गप्पा मारत होतो आणि त्याने मला सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा ‘भूल भुलैया’ पाहिला, तेव्हा त्याला सहा वर्षे विद्या बालनची भीती वाटत राहिली. जेव्हा जेव्हा ती आमच्या घरी यायची, तेव्हा आरव तिला भेटण्यास नकार द्यायचा. तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहतही नसे. खरे तर, माझ्या मुलाला विद्या बालनमध्ये नेहमीच ‘मंजुलिका’ची झलक दिसायची. तिच्या सहवासात असताना त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं.”
अक्षयने हे देखील सांगितले की, आपल्या मुलाची ही भीती दूर करण्यासाठी त्याने कशा प्रकारे प्रयत्न केले. तो म्हणाला, “मला आरवला हे समजावून सांगावं लागलं की विद्या बालन ही मंजुलिका नाही; ती विद्या बालनच आहे एक चांगली व्यक्ती आहे. मात्र, त्याने कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. सलग सहा वर्षे, विद्या बालनबद्दलची एक खोलवर रुजलेली भीती आरवच्या मनात घर करून राहिली होती.”
२००७ मधील ‘भूल भुलैया’ या चित्रपटामध्ये विद्या बालन हिने ‘मंजुलिका’ हे पात्र साकारले होते. या पात्राने प्रेक्षकांच्या मनात भीतीची एक खोलवर भावना निर्माण केली होती. हे पात्र एका बंगाली नृत्यांगनेची शोकांतिका सांगते; जिने एका राजाच्या कैदेत असताना आत्महत्या केली होती. विद्याने ही रहस्यमय, भयप्रद आणि हृदयस्पर्शी भूमिका साकरारली आणि या भूमिकेच्या तयारीसाठी तिने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. तिची ही भूमिका सगळ्यांचा आजही लक्षात आहे.






