फोटो सौजन्य - Social Media
SonyLIV वरील लोकप्रिय वेबसीरिज ‘गुल्लक’चा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यावेळी आनंद मिश्रा उर्फ अन्नूच्या भूमिकेत अभिनेता वैभव राज गुप्ता दिसणार नसल्याने चाहत्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात आहे. त्याच्या जागी आता अभिनेता अनंत व्ही जोशी झळकणार असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वैभव राज गुप्ताने ‘गुल्लक 5’ का सोडला? असा प्रश्न अनेक चाहते उपस्थित करत आहेत. दरम्यान, Reddit वरील एका अनव्हेरिफाइड पोस्टनुसार वैभवने मानधन वाढवण्याची मागणी केल्यामुळे निर्माते आणि OTT प्लॅटफॉर्मसोबत मतभेद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टनुसार, मागील सीझनमध्ये त्याला मोठे मानधन देण्यात आले होते आणि नव्या सीझनसाठी त्याने अधिक फीची मागणी केली होती. मात्र, मर्यादित बजेटमुळे निर्मात्यांना ती मागणी मान्य करणे शक्य झाले नसल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, वैभवचे मानधन वाढवले असते तर शोच्या इतर खर्चांवर परिणाम झाला असता. त्यामुळे टीममध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर ‘12th Fail’मधून लोकप्रिय झालेल्या अनंत व्ही जोशीची अन्नूच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चांवर अद्याप वैभव राज गुप्ता, TVF किंवा SonyLIV कडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
‘गुल्लक’ ही मालिका मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंबाच्या साध्या पण भावनिक आयुष्यावर आधारित आहे. घरखर्च, करिअर, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या क्षणांमुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. नव्या सीझनमध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायर, सुनीता राजवार यांसारखे कलाकार पुन्हा एकदा झळकणार आहेत.
‘गुल्लक 5’ हा सीझन 5 जून रोजी SonyLIV वर प्रदर्शित होणार असून वैभवच्या अनुपस्थितीत प्रेक्षक शोला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी “अन्नू म्हणजे वैभवच” अशी प्रतिक्रिया देत त्याची उणीव नक्कीच जाणवेल, असे म्हटले आहे.






