फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला 'या' अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि काळजाला भिडणाऱ्या कविता करणारा कवी म्हणून अभिनेता किशोर कदमची ओळख आहे. किशोर कदम यांनी आपल्या कवितांच्या जोरावर स्वत: ची ओळख तयार केली आहे, शिवाय त्यांच्या अभिनयाचीही संपूर्ण देशात चर्चा आहे. त्यांच्या कवितेने त्यांना सौन्मित्र म्हणून ओळख दिली आहे. अशा या बहुआयामी कलाकाराचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. अभिनेत्याच्या वाढदिवशी मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम किरण मानेने खास पोस्ट लिहिली आहे. कलाकार म्हटल्यावर इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे मित्र होतात.
मित्र म्हटल्यावर सुख दुख आपसूकच आलं. अशातच किरण माने यांनी आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण मानेने किशोर कदमच्या आयुष्यातील काळाविषयी भाष्य केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, किरण माने म्हणतात, “किशोर, आपल्या मैत्रीला अठ्ठावीस वर्ष होतील. जवळजवळ तीन दशकांतले एकमेकांच्या आयुष्यातले लै चढऊतार आपण बघितलेत. प्रत्येकवेळी प्रत्यक्ष बरोबर नसलो तरी आपण एकमेकांसोबत आहोत ही मनोमन खात्री आहे. बावीस-तेवीस वर्षांपूर्वीचा एक काळ असा होता की मी घरच्या परिस्थितीमुळं अभिनयात करियरचं स्वप्न गुंडाळून, सगळं सोडून सातारला येऊन राहिलो होतो… ”
“दुकान सुरू झालं. ‘आता आपण अभिनयात करियर करू शकणार नाही.’ या विचारांनी घुसमटलो होतो. एक दिवस दुकानासमोरनं मुंबईच्या एका व्यावसायिक नाटकाची गाडी पास झाली. ती गाडी बघितली आणि लय आठवणी जाग्या झाल्या… तू, मी, अतुल कुलकर्णी, भक्तीताई आपण अशाच गाडीतनं ‘गांधी विरूद्ध गांधी’ नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे केलेले आठवले! हे सगळं हरवलं कायमचं, या वेदनेनं कळवळलो. तिथनं थेट एका बारमध्ये गेलो. असं वाटलं आता डोकं शांत होईल. कशाचं काय? उलट डोक्यात भडका उडाला. घरी आलो… टेरेसवर जाऊन एकटाच ढसाढसा रडलो. बरोब्बर दुसर्याच दिवशी अचानक तुझा फोन आला. “किरण्या, किशोर बोलतोय…” त्यापूर्वी दोन वर्ष आपला एकमेकांशी कसलाही संपर्क नव्हता.”
“”आयला. किशोरच्या लक्षात आहे आपण!!??”.. तू म्हणालास “किरण्या, मी एक सिनेमा दिग्दर्शित करतोय. रंगनाथ पाठारेंच्या कादंबरीवर आधारित आहे. त्यात एक खूप महत्त्वाच्या रोलसाठी मला तू हवायस. पुण्यात भेटायला ये… त्या एका घटनेनं माझ्या मनाला लै लै लै उभारी दिली किशोर! जबराट क्षण जगलो तुझ्यासोबत किशोर. आज तू ‘सौमित्र’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस… पण आपली मैत्री झाली त्यावेळी तू फेमस नव्हतास… तू अचानक सातारला यायचास.. मग आपण कास पठारावर रात्रभर चांदण्यात ‘बसायचो’… कधी बामणोलीच्या रिसाॅर्टवर दोन दोन दिवस रहायचो.. आत्ता तुझ्या ज्या कविता महाराष्ट्राला पाठ आहेत, त्या खूप वर्ष आधी जन्मल्या-जन्मल्या ऐकायचं सुख मला लाभलंय ! ”
हे देखील वाचा – अर्चना पूरण सिंग संतापली! कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूचे पुनरागमन?
“सोलापूरमध्ये एकदा रात्रभर रंगलेली ती मैफिल तर आयुष्यात विसरणार नाही. सगळे मिळुन आठदहा जण असू.. अक्षरश: ‘माहौल’ जमलावता. कविता-गझल-शेरोशायरी-गप्पाविनोद…त्या मैफिलीत ग्रामोफोनवर ऐकलेलं उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचं “का करू सजनी आये ना बालम” आणि बेगम अख्तरचं “हमरी अटरीया पे आवो सँवरीया.”… आठवून दिल बाग-बाग होतं. तुझं कवितांचं पहिलं पुस्तक पॉप्युलरनं प्रकाशित केलं होतं ‘…आणि तरीही मी’ ! ते मला भेट देताना तू त्यावर लिहीलंस, “प्रिय किरण, माझ्या कवितांवर माझ्याइतकंच प्रेम करतोस. जर आपल्या आयुष्यात ‘गांधी’ नसते आले तर? तरी कुठेतरी भेटलो असतोच आणि असेच असेच मित्र असतो !” किशोर, वाढदिवसाच्या लै लै लै शुभेच्छा. लब्यू”