(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला प्रवास आणि प्रत्येक क्षणी चकित करणारा थरार अशा सगळ्या घटकांनी सजलेलं ‘भुल भुलैय्या’ हे नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर रंगणार आहे. सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं आणि काय खोटं, हे ओळखणंच कठीण होतं अशा गुंतागुंतीच्या भावविश्वाचा रोमांचक अनुभव हे नाटक प्रेक्षकांना देणार आहे. या नाटकाची चर्चा आता सध्या प्रेक्षकांमध्ये होताना दिसत आहे.
या बहुप्रतीक्षित नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार, १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. त्यानंतर २० एप्रिल रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आणि २१ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथेही प्रयोग सादर केले जाणार आहेत. ‘भुल भुलैय्या’ हे नाटक रंगत संगत आणि लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले जात आहे. नाटकाची कथा हेमंत एडलाबादकर यांनी लिहिली असून, रंगावृत्ती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश कुमार सोहोनी यांनी सांभाळली आहे. तसेच नाटकाची निर्मिती रणजित देसाई आणि केदार सामंत यांनी केली आहे.
‘सुपर डुपर’मधील ‘अंगाई’ गाण्याने जिंकले मन; Swanand Kirkire यांच्या आवाजाने भावूक झाले प्रेक्षक
या नाटकाचं खास आकर्षण म्हणजे प्रिया बेर्डे यांचं रंगभूमीवर होणारं पुनरागमन. अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येत असून, या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहेत. या आनंदाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “मी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते, पण पुन्हा काम करण्यासाठी एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत होते. ‘भुल भुलैय्या’मधून पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे.”
या नाटकात साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोलंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे आणि विजय सूर्यवंशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली असून, संगीत विजय गवंडे यांचं आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे, तर सूत्रधार म्हणून विजय सूर्यवंशी प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवणार आहेत.
‘बम ल्यारी में फूटा…’, Zakir Khan चा इंडस्ट्रीवर थेट टोला; धुरंधरचे यश पचवता येणार नाही
एकंदरीत, ‘भुल भुलैय्या’ हे नाटक केवळ एक रहस्यकथा नसून, मानवी मनातील गुंतागुंत, भ्रम आणि वास्तव यांच्यातील संघर्ष यांचं प्रभावी चित्रण करणारा एक थरारक अनुभव ठरणार आहे. मराठी रंगभूमीवर एक वेगळा आणि संस्मरणीय ठसा उमटवण्याची क्षमता या नाटकात निश्चितच आहे.






