(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हिंदी चित्रपटांच्या चर्चेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला पाया चित्रपटगृहात भक्कम ठेवला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ चित्रपटाने बाॅलीवूडच्या इतर चित्रपटाला धडक दिली असली तरी ‘दशावतार’ ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान बळकट केले आहे. चौथ्या आठवड्यातसुद्धा ‘दशावतार’ दिडशे थिएटर्स आणि सुमारे दोनशेच्या वर शो करून प्रेक्षकांची तुफान गर्दी दिसली आहे. हीच मराठीतील सकस कथेची, अर्थपूर्ण मराठी चित्रपटाची आणि सुजाण मायबाप रसिकांच्या प्रेमाची ताकद आहे. या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देश येथे ‘दशावतार’ ने आपला झेंडा फडकवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले आहे. दशावतार मुळे चित्रपट गृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली.
अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र
कोकणातील अनेक बंद चित्रपटगृहांची दारे ‘दशावतार’ चित्रपटासाठी पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’ वर कमावले. काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर ‘दशावतार’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात ‘दशावतार’ ची खूप प्रशंसा झाली. अशा रितीने मराठी चित्रपट उद्योगाला आलेली अडचण दूर करून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार चित्रपटाने केले आहे . इतकेच नव्हे तर ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरला आहे. कोकण आणि गोवा इथंवरच मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुण्या मुंबईतून खेळांची मागणी येत आहे.
‘दशावतार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे फक्त प्रेम कमावले नाही तर ते आत्मसात करण्याचा अनुभवही मिळवला. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. नुकताच ( २७ सप्टेंबर २०२५) जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीने निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्याशी कातळशिल्पं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सामंजस्य करार केला आहे. यामुळे कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा विकास होणार आहे. मराठी सिनेउद्योग , दशावतारी कला, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाबाबत होत असलेले सकारात्मक बदल हेच ‘दशावतार‘ या चित्रपटाचे फार मोठे यश म्हणावे लागेल.