(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाईचे वातावरण पाहायला मिळत असून चाहत्यांमध्ये ‘बिग बॉस मराठी’ तिसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु होती. मेहंदी, साखरपुडा आणि प्री-वेडिंग सोहळ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली होती.
आता अखेर विशालने अक्षयासोबत आयुष्यभराच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे सुंदर क्षण सोशल मीडियावर झळकत आहेत. पारंपरिक वेशभूषेत दोघेही अत्यंत देखणे दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशाल आणि अक्षयाने हा लग्न सोहळा त्रियुगीनारायण मंदिरात पारंपरिक पद्धतीत केला आहे, त्यांचे हे साधे परंतु हटके लग्न पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील मित्रांकडून दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑनस्क्रीन लोकप्रियता मिळवलेल्या या जोडीने आता ऑफस्क्रीनही एकत्र आयुष्याची नवी इनिंग सुरू केली असून, त्यांच्या या नव्या प्रवासासाठी सर्वे शुभेच्छा देत आहेत.
विशाल निकमने आपल्या वाढदिवशीच केले लग्न
१० फेब्रुवारी २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत लिहिले, “आज १० फेब्रुवारी २०२६, माझा वाढदिवस. सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. प्रवास आणि कार्यक्रमांमुळे reply / call घेता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व… आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी (अक्षया) सात जन्मांची गाठ बांधली… लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं. फोटो उद्या अपडेट करेन… हर हर महादेव.” विशालच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आनंदानी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवस आणि लग्नाचा दुहेरी आनंद साजरा करत विशाल आणि अक्षयाने आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘साता जन्माच्या गाठी’मधून विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर ही जोडी प्रथमच एकत्र झळकली होती. मालिकेतील त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांनी या जोडीवर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या व्यक्तिरेखांमधील भावनिक क्षण, नात्यातील चढ-उतार आणि एकमेकांवरील विश्वास यामुळे ही जोडी घराघरात पोहोचली होती. आता हीच लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे.






