धर्नवीर 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी देवेंद्र फडणवीस यांनी धर्मवीर 3 चित्रपटाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. काल सायंकाळी धर्मवीर 2 चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते. त्यानंतर आता या सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. धर्मवीर 3 या चित्रपटाची कथा मी लिहिणार असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
धर्मवीर 2 चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांना प्रतिक्षा असलेला धर्मवीर 2 प्रेक्षकांच्या भेटीस आला असून चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू झाले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित धर्मवीर 1 हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला. त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला. त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की ‘धर्मवीर 2’ आला पाहिजे. ‘धर्मवीर 1’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. लोकांना तो अतिशय आवडला. एखाद्या चित्रपटातले चरित्रनायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय असे चरित्रनायक जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतात, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले जातात, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
🔸Grand Premiere of ‘Dharmaveer 2, Mukkam Post Thane’
🔸’धर्मवीर 2, मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिमियर’
🕚11pm | 26-9-2024📍Mumbai | रा.११ वा. | २६-९-२०२४📍मुंबई.@cbawankule @mipravindarekar @PrasadLadInd @GopichandP_MLC @DrSEShinde @KayandeDr @prasadoak17… pic.twitter.com/PxLHIldr16— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2024
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसापर्यंत जात आहे. यातूनच लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. मलाही चित्रपटाबाबत उत्कंठा आहे. काही गोष्टी मी पाहिल्या आहेत, काही पाहायच्या आहे, अशी उत्सुकता फडणवीस यांनी केली. तसेच माध्यमांनी तुम्ही चित्रपट निर्माण करणार का ? यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सूचक विधान करत मिश्कील टिप्पणी केली. फडणवीस म्हणाले की, जेव्हा धर्मवीर ३ येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन” अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर 2 चित्रपटातून शिवसेनाप्रमुख हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा ठाणेचे जिल्ह्याध्यक्ष आनंद दिघे मोठे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या मदतीने बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारेंसारखे अनेक लोक आनंद दिघेंच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरांवर काल्पनिक कथा रचून पडद्यावर चित्रपट आणण्यापेक्षा धर्मवीरांप्रमाणे तुम्ही शिवसेनेप्रती निष्ठा बाळगली असती, तर तुम्हाला असे चित्रपट काढून स्वत:चा डंका पिटायची वेळ आली नसती. देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबवर चित्रपट काढावा, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.