Sanjay Raut: मविआचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींच्या ऑफरचा संजय राऊत यांचा दावा, भाजपचं प्रत्युत्तर
ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांनीसुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत असतानाच आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसू शकतो. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मोठा दावा केला असून आगामी काळात एकनाथ शिंदे आणखी एक आमदार फोडू शकतात असे विधान त्यांनी केले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराला फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार धीरज लिंगाडे यांचे नाव घेत, त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला.
संजय राऊत म्हणाले, “माझ्या कानावर आले आहे की धीरज लिंगाडे यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आमदारकीचं आश्वासनही त्यांना देण्यात आलं आहे. ही घटना काल-परवाची आहे.”
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’
राऊत यांनी हा आमदार ठाकरे गटाचा नसून काँग्रेसचा असल्याचे स्पष्ट करत, महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवरही जोरदार टीका केली. “तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि पैसा आहे. पण हा पापाचा पैसा आहे, तो कुणालाही पचणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “मोदी अमर आहेत का? अमित शाह अमर आहेत का? फडणवीस आणि शिंदे अजरामर आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सत्तेच्या अहंकारावरही निशाणा साधला.
संजय राऊत यांच्या आरोपांवर भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, कोणत्याही लोकप्रतिनिधीबद्दल पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. “संजय राऊत यांच्या अशाच वक्तव्यांमुळे त्यांच्या पक्षातील लोक त्यांना सोडून जात आहेत,” असा पलटवार भोयर यांनी केला.
दरम्यान, माजी मंत्री सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर पक्षात आणखी फूट पडण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षातील आमदारांशी थेट संवाद साधून पुढील रणनीती ठरवण्याबरोबरच संभाव्य पक्षांतर रोखण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






