सुनावणी पुन्हा लांबणीवर (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याची सुनावणी आज होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर 2022 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे अधिकृत नाव शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर पार पडणार होती. यात प्रत्येक गटाला 3 तास युक्तिवाद करण्याची संधी मिळणार होती. मात्र, आता याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, येत्या शुक्रवारी (दि.23) सकाळी 11 वाजता याप्रकरणी सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला” उबाठाच्या दुटप्पीपणावर उदय सामंत यांची सडकून टीका
दरम्यान, राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र, आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह यावर निकाल दिला जाणार आहे.
आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह यावर निर्णय येणे अद्याप बाकी आहे. त्यात महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ मानसन्मान राखला तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत यापूर्वीच दिले आहेत.
हेदेखील वाचा : ‘आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल’; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान






