महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले, धीरज देशमुखांची महायुती सरकारवर टीका
पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कधीच दिल्ली पुढे झुकला नाही. परंतु, महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अडाणी समजून अदानी उद्योगाला मदत करण्याचे धोरण या सरकारचे आहे. या माध्यमातून ते महाराष्ट्राची लूट करत असल्याचा हल्लाबोल लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केला.
काडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित संवाद बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकी उपस्थित आमदार धिरज देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे काम महाराष्ट्राचे सरकार करत आहे. कोरोना काळामध्ये जर हे सरकार असते. तर जनतेचे काय झाले असते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा महाराष्ट्र सरकारने कोरोना काळामध्ये उत्तम काम केले असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वैद्यकीय मंत्री अमित विलासराव देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गाव-खेड्यापर्यंत लस, रेमिडेसिव्हर इंजेक्शन पुरवण्याचे काम केलेल आहे. पण त्याची जाहिरात त्यांनी कधी केली नाही. पण हे सरकार जनतेच्या पैशावर जाहिराती करत आहे.
सर्वसामान्य जनतेचे हित जोपासणे हे सरकारचे काम असते, असे सांगून सरकारने गुजरातचा विकास केला. उद्योगपतींना श्रीमंत केले. तसेच नऊ कोटी मतदार असलेल्या महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने एक लाख कोटींच्या घोषणा केल्या आहेत. निवडणूक समोर ठेवून घोषणा केल्या जातात का? महाराष्ट्राची लूट महाराष्ट्राच्या जनतेला अडाणी समजून अदाणीला मदत करत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नाहीत. चाळीस हजार कोटीची कॉन्ट्रॅक्टदारांची बिले थकलेली आहेत. सरकार दिवाळखोरीत निघालेले आहे आणि या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकवला असल्याची जहरी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. मांजरा परिवाराने लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्यांने एकाच वेळी १०० हार्वेस्टरचे (ऊस तोडणी यंत्र) वाटप केले आहे. बेरोजगारांना काम दिले आहे. मांजरा परिवार व जिल्हा मध्यवर्ती बँकेने तुती लागवड करणाऱ्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सक्षम झाल्या पाहिजेत याच्यासाठी बचत गटांना ही वाढीव कर्ज आम्ही देत असल्याचे ते म्हणाले. उमेदवार कोणीही असला तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत मतदार संघांमध्ये शांतता राहिली पाहिजे. गुंडगिरी होता कामा नये. ज्यांना शेती कळते, त्यांना राजकारण ही कळते. महाराष्ट्र सरकारने अख्खे मंत्रिमंडळ गुजरात मार्गे गुवाहाटीला नेले. असे काम काँग्रेसने कधीच केले नाही, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पाचशे रुपये सन्मान निधी देण्यापेक्षा त्याच्या सोयाबीनला किमान सहा हजार रुपये द्या. असे सांगून बाहेरच्या देशाचे सोयाबीन अदानी उद्योग समूह खरेदी करतो आहे. बाहेरून सोयाबीन आणण्यापेक्षा लातूरच्या शेतकऱ्याचे सोयाबीन या सरकारने खरेदी करावे, असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्ट न्याय देऊ शकले नाही. आत्ता या सरकारचा निकाल लावण्याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या दरबारात आला आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकवता कामा नये असे सांगून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना पाहण्यासाठी जसे ब्राझीलहून माणसे आली, जिल्हा मध्यवर्ती बँक पाहण्यासाठी नाफेडची माणसे आली. येणाऱ्या काळात लातूर मतदार संघ पाहण्यासाठी सुद्धा बाहेरून माणसे येथील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दोन कोटी रोजगार देऊ, प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये देऊ असे म्हणणारी भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना काम करू देत नाही आणि सत्तेत आल्यावर काम करत नाही. चारशे रुपयांचा गॅस एक हजार रुपये गेला. निवडणूक म्हणजे शिमगा नसून ते एक लोकशिक्षण आहे. आम्ही कधी भेदभाव केला नाही. विरोधकांनाही सढळ हाताने मदत केली आहे, आमची भावना सामाजिक बांधिलकीची आहे. गुळ पावडर काढणारे साखर कारखान्यावर बोलतात असा प्रश्न उपस्थित करून आमच्याबरोबर स्पर्धा जरूर करा, ऊसालाही चांगला भाव द्या, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.






