2029 मध्ये महायुती सरकार कोसळणार असल्याचा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, ‘घातपाताचा कट प्रकरणात पोलीसांना आरोपींनी जबाब दिला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावलं जात नाही. अटक केली जात नाही. अजित पवार आणि फडणवीस यांच्यावरती शंका उपस्थित करणारा प्रश्न आहे. 100% धनंजय मुंडे त्यांच्या पायाखाली लोळला आहे. जरांगे पाटील यांच्या चौकशी पासून टाळा अशी विनंती केली असेल. रश्मी शुक्ला यांना माझी विनंती आहे, जो घातपात करत असेल त्यांना वाचवू नका, फडणवीस साहेब तुम्ही या पापामध्ये सहभागी होऊ नका. मराठ्यांची लाट फडणवीस आणि अजित पवार तुम्ही घेऊ नका.’असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
हे देखील वाचा : भास्कर जाधव ठरले ‘ऑपरेशन टायगर’चे शिकार? विरोधी पक्षनेते न मिळताच घेतली शिंदेंच्या नेत्याची हॉटेलमध्ये भेट
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “अडीच कोटीची सुपारी घेतली त्या पोरांच्या कुटुंबांना मी दोष देणार नाही. समाजाला सांगितले आहे की आरोपीच्या कुटुंबाना त्रास द्यायचा नाही. करणाऱ्या पेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे तो म्हणजे धन्या आहे. अजित दादांनी धन्या सारखी लोक ठेवू नयेत, ते तुमच्यासाठी आणि मराठा समाजासाठी घातक ठरतील. तुमच्या पक्षाचा विनाकारण बळी जाऊ नये, तुमच्या पक्षाची उतरती कळा त्यांच्यामुळे लागू नये. तुमच्या पक्षातील लोक चांगले आहेत, मात्र याच्या एकट्यामुळे तुमचा नाश तुम्ही करून घेऊ नका असं माझं अजित दादांना सांगणं आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे.” असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.
हे देखील वाचा : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा
मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “मराठे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात गेले तर 2029 हातातून सत्ता जाऊ शकते. काँग्रेस पक्ष समुद्रासारखा होता त्याची देखील सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली त्यामुळे फडवणीस यांनी गर्वात राहायचं नाही. ते असं जर करत राहिले तर सरकारला उतरती कळा लागणार. मराठे सोपे नाहीत, जीवाला जीव देणारे मराठे आहेत. धनंजय यांच्या पापात अजित पवार आणि फडणवीस सहभागी झाल्यामुळे यांच्या पक्षाचा सत्तेचा बळी जाऊ शकतो.” अशी राजकीय भविष्यवाणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली.






