खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणूक आणि अर्थसंकल्प यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “जर निवडणुकीची गरज नसेल, तर उगाच घोडेबाजार करण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात यापुढे कोणीही घोडेबाजार करू नये, असे माझे मत आहे. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये दोन विधानपरिषद आणि एक राज्यसभा सदस्य निवडून देण्याइतके बळ आहे. पण जर कोणी घोडेबाजार करून राजकारणात पैशाची चटक वाढवत असेल, तर ते राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. निवडणूक बिनविरोध झाली तरी चालेल. आम्ही आणि इतर सहयोगी पक्ष मिळून साधारण 50 च्या आसपास आहोत. त्यामुळे विरोधी पक्ष दोन विधानपरिषद जागा जिंकू शकतो,” असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत
पुढे ते म्हणाले की, “सरकार पक्षाकडे सध्या प्रचंड बहुमत आहे. त्यांनी महाराष्ट्रात घोडेबाजार करू नये. दिल्लीतील सरकार घोडेबाजारातून आले असेल, पण महाराष्ट्रात अशी परंपरा वाढवू नये. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे बहुमत आहे. त्यांनी महाराष्ट्रावर भविष्यात घोडेबाजाराचा कलंक लागू देऊ नये,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका
ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्य़ात आली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या हायकमांडने काही निवड केली असेल, तर त्यावर मी भाष्य करणार नाही. पण एखाद्या सामान्य कुटुंबातील, दलित-शोषित समाजातील कार्यकर्त्याला महत्त्वाचे पद मिळत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे. आमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला पद मिळत असेल, तर त्याचे स्वागत खुले मनाने केले पाहिजे. तुम्ही ज्योती वाघमारे यांचे नाव घेत आहात. त्या आमच्यावर टीका करतात, अपशब्द वापरतात असे मला लोकांकडून ऐकायला मिळते. ठीक आहे, ती त्यांची संस्कृती किंवा पक्षाचे संस्कार असतील,” असा टोला देखील खासदार राऊत यांनी लगावला आहे.






