ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून, त्यापैकी ४ खासदार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. तर इतर दोघे बुधवारी सकाळपर्यंत दिल्लीला पोहोचणार आहेत, अशी माहिती सध्या समोर आली आहे.
ठाकरे गटाचे हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन वेगळा गट स्थापन करणार आहेत. त्यानंतर हा गट शिवसेनेत विलीन होईल, अशी रणनीती आहे. दरम्यान, रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीत दाखल झाले. मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सात खासदारांशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात होता. खासदार संजय राऊत यांनी या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत पक्ष एकसंघ, मजबूत मजबूत आणि सक्षम असल्याचा दावा केला होता.
या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ९ खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ४ खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर ५ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ च्या शक्यतांना बळ मिळाले.
उद्धव ठाकरे यांचे शिलेदारही दिल्लीत
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल झाले आहेत. सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यास त्यांची खासदारकी कशी रद्द करता येईल, त्यासाठी कोर्टाचे दार ठोठवयाचे झाल्यास काय करता येईल, याबाबत कायदेतज्ज्ञांची चर्चा केल्याचे कळते.
चार्टर विमानाने दिल्लीत
उद्धव ठाकरे यांच्या खासदारांना दिल्लीला जाण्यासाठी चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. या विमानातून चौघेजण रवाना झाल्याचे कळते. दोन खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात होते. तर संजय दिना पाटील मुंबईत होते. ते पहाटे दिल्लीला निघतील, असे वृत्त आहे.
वेगळा गट स्थापन करणार
राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे गटाकडे लोकसभेत सध्या नऊ खासदार आहेत. पक्षांतरविरोधी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजे सात खासदारांनी एकत्रितपणे वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे ‘सात खासदार’ हा आकडा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सध्या उद्धव यांचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार का, असा सवाल करण्यात येत आहे. ९ पैकी ६ खासदार असले तरी वेगळा गट स्थापन करता येऊ शकतो, असा काही कायदे तज्ज्ञांचे मत आहे.
हे खासदार फुटणार?
– संजय जाधव
– संजय देशमुख
– भाऊसाहेब वाकचौरे
– ओमराजे निंबाळकर
– नागेश पाटील-आष्टीकर
– संजय दीना पाटील






