फोटो सौजन्य- सोशल मीडिया
सचिन वाघमारे
Personality Development Tips: प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्त्व इतरांवर प्रभाव पाडणारे असावे, असे वाटत असते़. त्यासाठी तरूणाई वेगवेगळे प्रयत्न करत असते. काहीजण त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास क्लासेसही जॉईन करतात़. तर काहींनी आपला आदर्श ठरवलेला असतो. त्याप्रमाणे स्वत:चे वागणे, बोलणे बदलून आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा किंवा तसे बनण्याचा ते प्रयत्न करतात़. मग, कधी त्यांचे आदर्श हे महापुरूष असतात तर कधी चित्रपटातील हिरो-हिरॉईन किंवा कधी खेळाडू़ पण. या पलीकडे जाऊन व्यक्तिमत्वाचे काही पैलू आहेत, ते जर आपण अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही काळात, कोणत्याही वेळेत आपले व्यक्तिमत्त्व नक्कीच प्रभाव पाडणारे आणि इतरांना आवडणारे ठरेल़ त्याचा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर उपयोग होईल़ हे पैलू कोणते ते आता आपण आजच्या पाहणार आहोत.
कोणत्याही समाजातील तरूण वर्ग हा त्या समाजाचा कणा असतो़ आपल्या देशाच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे नेहमीच सांगितले जाते़. मात्र, या तरूणांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही़ त्यामुळे हुशार, सुशिक्षित तरूण चुकीच्या मार्गावर जातात़. काहीजण क्षमता असूनही आपल्यातील गुणांना योग्य न्याय देऊ शकत नाहीत़. आयटीत काम करण्याची क्षमता असणारे तरूण बीपीओतील नोकरी स्विकारून वेळेशी तडजोड करतात़.
तरूणांमधील बेरोजगारी, नैराश्य, जीवघेणी स्पर्धा यावर मात करण्यासाठी काही मूलभूत गुणांची गरज आहे़, हे आपल्याला माहितीच आहे. स्पर्धेच्या युगात मूलभूत कौशल्यांना (सॉॅफ्ट स्किल) महत्त्व प्राप्त झाले आहे़. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना किंवा ते पूर्ण झाल्यानंतर आपले व्यक्तिमत्त्व कसे असले पाहिजे. याविषयी नेहमीच तरूणाईला प्रश्न पडलेला असतो़. आता नव्या आव्हानांना सामोरे जाताना आपल्यातील नेमके कोणते गुण कामी येतात याविषयी थोडक्यात जाणून घेऊया़…
कोणत्याही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्क म्हणजे त्याचे चारित्र्य मानले जाते. विचार आणि कृतीतील पावित्र्य जपणे म्हणजे चारित्र्य़. चारित्र्य आणि पावित्र्य यांचा खूप जवळचा संबंध आहे़. चारित्र्यवान व्यक्तिमध्ये सूज्ञता असते. याचा अर्थ एकप्रकारे शुद्धबुद्धी़ किंवा कॉमन सेन्स होऊ शकतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात राष्ट्रीय चारित्र्याची जोपासना याविषयाला खूपच महत्व दिले गेले होते. त्यामुळे देशाने खूप महान व्यक्ती पाहिल्या. आजही विद्यार्थी आणि तरुणांमध्ये चारित्र्याचे महत्त्व पटवून देण्याची आणि ते घडविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे़
आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही नवं करण्याची उर्मी असते. ती त्या व्यक्तिच्या नवनिर्मितीची शक्ती असते़. एखादा प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकविण्यात हुशार असतो तर एखाद्या गॅरेजमनचा दुचाकी दुरुस्त करण्यात हातखंडा असतो़. ही सर्जनशीलता प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते़ ती आपल्याला ओळखता यायला हवी़. तिचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी ज्ञान ही गोष्ट आपल्याला खूप मदत करते.
आपण आज आपल्या सभोवती माहितीचा विस्फोट झालेला पाहतो़. युवकांवर रोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती येऊन आदळत असते, ज्यामुळे काहीवेळा आपण त्या माहितीलाच ज्ञान समजून बसतो़. मात्र, त्यातून आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे, हे जाणण्यासाठी आपल्याकडे शुद्ध ज्ञान असले पाहिजे़. त्यामुळे नवनिर्मिती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़, हे दोन्ही अंगभूत गुण आहेत़.
मित्रांनो, समाधान हा व्यक्तिमत्त्वाचा दागिना आहे. समाधानासोबतच व्यक्तिमध्ये औदार्य येते़. क्षणोक्षणी असमाधानी राहणाऱ्या व्यक्ती इतरांना आनंद देऊ शकत नाहीत़. तसंच, त्या इतरांच्या आनंदातही सहभागी होऊ शकत नाहीत़. अशा व्यक्ती प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असतात़. खरोखर अंतरंगातून समाधानी असणाऱ्या व्यक्ती सदैव स्थिर असतात़. याचा अर्थ असा नाही की आपण अल्पसंतुष्ट राहिले पाहिजे़.
समाधानाबद्दल एक सर्वसामान्य उदाहरण नेहमी सांगितले जाते आणि ते खरेही आहे; ते म्हणजे, एखादी खूप श्रीमंत व्यक्ती असते. मात्र, तिच्याकडे सर्व भौतिक सुख-सुविधा असूनही त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो़. त्याउलट, एखादा झोपडीत राहणारा मनुष्य मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईमध्येही आनंदी दिसतो़ कारण त्यामागे समाधान हा एक गुण असतो़.
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात धाडस करावे लागते. त्यासाठी येणारी धैर्यशक्ती आपल्यामध्ये असावी लागते. आपण सहजपणे म्हणून जातो की ते काम करण्याचं ‘डेअरिंग’ माझ्यात आहे. साहस हा गुण आपल्या विकसित करावा लागतो़. अनेकजण म्हणतात, अनुभवातून आपलं धाडस वाढतं पण, एखादा चोर घरामध्ये शिरल्यानंतर त्याच्याशी लढायला आपल्या कुठे अनुभव असतो़. त्यासाठी साहस हा अंगभूत गुणच आपल्याला उपयोगी पडतो़. म्हणून स्वत:वर विश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास हा कोणत्याही विजयाचा पाया असतो़.
आत्मविश्वास किंवा धैर्य हे गुण म्हणूनच महत्त्वाचे ठरतात़. आपले आरोग्य किंवा शारिरीक तंदुरूस्तीही आपल्याला एकप्रकारे आत्मविश्वास देतात़. त्यामुळे तरुणांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी व्यायामशाळेत जाऊन मोठी वजने उचलण्याची गरज नाही़, पण साध्या व्यायामाने आपले शरीर निरोगी ठेवले पाहिजे.
आजच्या काळात संवादकौशल्यांना खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. दळवणळणाची अनेक संपर्कमाध्यमे विकसित झाली आहेत़. आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं किंवा वाचलं असेल की, संवादकौशल्याची सुरवात ही, चांगल्या ऐकण्याने होते. म्हणजे, तुम्ही ‘गुड लिसनर’ चांगलं ऐकणारे असाल तर, तुम्ही चांगला संवाद साधू शकता. आपले, ऐकणे परिपूर्ण असण्यासाठी आपल्याला कोणत्याही क्षणी साक्षी भावात राहता आलं पाहिजे, म्हणजे स्वत:पासून आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे.
एकाचवेळी आपण सर्वांमध्ये असतो आणि त्याचवेळी स्वत:शी आपला संवाद सुरू असतो़. त्याठिकाणी आपण कोणतीही प्रतिक्रिया देत नाही़ तर सभोवतीच्या वातावरणाशी जुळवून घेत असतो़. व्यक्तिमत्त्वाच्या या महत्त्वपूर्ण गुणामुळे आपण दहा जणांमध्ये उठून दिसतो़. थोडक्यात, आपण कोणत्याही समूहाचा भाग झालो तरी, आपण आपला ठसा त्याठिकाणी उमटवू शकतो़.
आजच्या जगात अनेक वाद-विवाद सुरू असलेले आपल्याला दिसतात़. स्पर्धेच्या काळात तुम्ही जिथे काम कराल, तिथे तर अनेक ताण-तणावांना आपल्याला सामोरे जावे लागते. मात्र, आपण जर क्षमा करायला शिकलो तर, या सर्व गोष्टींचा आपल्याला कोणताही त्रास होणार नाही़. आपल्या सभोवतीच्या आव्हानांवर मात करण्याची प्रत्येक व्यक्तिची एक पद्धत असते.
शारीरिक, मानसिक किंवा भावनिक कौशल्यांचा वापर करून आपण आपल्या प्रश्नांना उत्तरे शोधत असतो किंवा त्यावर मात करत असतो़. त्याला फिजीकल, मेंटल कोशंट, इमोशनल इंटेलिजन्स म्हटले जाते. मात्र, नव्या संशोधनामध्ये काही व्यक्तिंमध्ये ‘स्पिरीच्युअल इंटेलिजन्स’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे, मानसिक, भावनिक ताणतणावांच्या पलीकडे जाऊन परिस्थितीवर मात करण्याचं कसब हे आपल्या व्यक्मिमत्त्वातील क्षमाशिलता या गुणामुळे मिळू शकते. त्यासाठी आपण इतरांना क्षमा करायला शिकायचं. त्यामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. अलीकडे क्षमाशीलतेवर अधिक संशोधन होऊ लागले आहे. त्यापुढे जाऊन शास्त्रज्ञांनी आता आध्यत्मिक भावनिकतेला मान्यता दिली आहे.
वरील सर्व गुण एखाद्या व्यक्तिमध्ये कमी अधिक असून चालणार नाहीत. त्यासाठी हे सर्वच गुण तरुणांमध्ये असणे आवश्यकच आहे. त्यासाठी या गुणांची सर्वसमावेशकता असली पाहिजे़. एखाद्या सभागृहात अंधार आहे. खिडकीतून उजेडाचा कवडसा येत असेल तर, आपण एखादीच खुर्ची किंवा टेबल त्या उजेडात पाहू शकतो़. मात्र, संपूर्ण सभागृहात प्रकाश असेल तर, सर्व सभागृह आपल्याला एका नजरेत पाहता येते. त्याचप्रकारे, वरील सात गुणांचा आपल्यामध्ये विकास झाला पाहिजे. त्यासाठी आपण स्वत:च प्रयत्न करावा़. बाहेरून मदत मिळवून किंवा कृत्रिमपणे ते करता येणार नाही़. ते आपल्यामध्ये बिंबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. तसा, योगच सहजपणे आपण आपल्यात घडवून आणला पाहिजे.
अशाप्रकारे, वरील सात गुण हे प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची दागिने आहेत़. राज्य सरकारने प्रमाणित केलेल्या शालेय अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट वरील गुण मुलांमध्ये विकास करणे हेच आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्ये शिकवताना अॅटिट्यूडचे महत्त्व सांगितले जाते. हा अॅटिट्यूडही वरील सात गुणांमुळे तयार होतो़.
तुम्ही इतर कोणतेही चांगले गुण आठवून पाहा, त्यांचे मूळ या सात गुणांमध्ये असल्याचे दिसून येईल. प्रत्येक तरुणाची वाटचाल पूरिपूर्णतेकडे होत असते. या वाटचालीत सूज्ञता ठेऊन वरील गुण जोपासले तर, ती वाटचाल सोपी होईल़ त्यामुळेच सूज्ञता (विस्डम) हा खरा माणसाचा सर्वाेत्तम अॅटिट्यूड असतो़ बघा, तुम्हाला पटतंय का?






