BCCI च्या विद्यमान नियमांनुसार कोणताही सक्रिय भारतीय क्रिकेटपटू जो आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा आयपीएल कराराअंतर्गत आहे त्याला कोणत्याही परदेशी टी२० किंवा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. मात्र भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आणि आयपीएलमधून निवृत्तीनंतर, परदेशी टी२० किंवा फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यास परवानगी आहे. याच नियमाचा फायदा घेत अनेक खेळाडूंनी अचानक निवृत्ती घेत परदेशी लीगचा मार्ग स्वीकारला आहे. विजय शंकरने नुकतीच निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच लंका प्रीमियर लीगमध्ये सहभाग निश्चित केल्याने हा मुद्दा अधिक चर्चेत आला.
वृत्तानुसार, अॅपेक्स काउन्सिल बैठकीत खेळाडूंवर ‘कूलिंग ऑफ पिरियड’ लागू करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला. या प्रस्तावानुसार, एखाद्या खेळाडूने निवृत्तीनंतर परदेशी लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्याला भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी किमान पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणजेच त्या खेळाडूला बीसीसीआयच्या स्पर्धांमध्ये किंवा आयपीएलमध्ये त्वरित पुनरागमन करता येणार नाही.
बीसीसीआयला देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलची प्रतिष्ठा कायम राखायची आहे. अनुभवी खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्येच अधिक काळ योगदान द्यावे, अशी बोर्डाची इच्छा आहे. त्यामुळेच परदेशी लीगकडे वाढणारे आकर्षण कमी करण्यासाठी कठोर नियमांची आखणी केली जात आहे. या धोरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांकडे सोपवण्यात आली आहे.
IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?






