IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई
आयपीएल २०२६ क्वालिफायर २ सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे क्वालिफायर २ आणि फायनल सामना यांच्यामध्ये फक्त एका दिवसाचे अंतर आहे. तसेच, हे दोन्ही सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. त्यामुळे प्रवास, लॉजिस्टिक्स आणि मॅनेजमेंट लक्षात घेता राखीव दिवस ठेवणे शक्य नसल्याचे मानले जाते.
आयपीएलच्या खेळाच्या नियम आणि अटींमधील कलम १६.१०.३ मध्ये या परिस्थितीसाठी स्पष्ट नियम देण्यात आले आहेत. नियमानुसार, जर पाऊस किंवा खराब हवामानामुळे प्लेऑफ सामना पूर्णपणे रद्द झाला, तर लीग टप्प्यात गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. नियमांनुसार, पंच प्रथम सुपर ओव्हर खेळवण्याची शक्यता तपासतील. जर हवामानामुळे सुपर ओव्हरही शक्य झाली नाही, तर लीग टप्प्यातील गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. याच कारणामुळे गुजरात टायटन्सला फायदा होईल. लीग टप्पा संपल्यानंतर गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे सामना रद्द झाल्यास गुजरात थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाणेफेकीच्या सुमारे अर्धा तास आधी मुल्लानपूरमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच संपूर्ण सामन्यादरम्यान आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, आसपासच्या भागात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ सामना शुक्रवार, २९ मे रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार ७. ३० वाजता सुरु होईल तर सायंकाळी ७:०० वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात उतरतील.
एकीकडे गुजरात संघाने शेवटच्या सामन्यात पराभव पत्करला, तर दुसरीकडे रियान परागच्या राजस्थान रॉयल्सने शेवटच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे क्वालिफायर २ मध्ये चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना रविवार, ३१ मे रोजी खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात टायटन्स किंवा राजस्थान रॉयल्स यांच्यापैकी एका संघाशी होईल.






