प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. अभिषेक शर्मा ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर फक्त २ धावा करुन बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ईशान किशनने वैभव सूर्यवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. ११ व्या षटकात सिकंदर रझाने ईशान किशनला बाद केले आणि भारताला दुसरा विकेट पडली. ईशान किशनने चार चौकारांच्या मदतीने २८ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. भारताची तिसरी विकेट १५ व्या षटकात वैभव सूर्यवंशीच्या रूपाने पडली. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वेस्ली माधवरेने बाद केले. वैभव सूर्यवंशीने ४९ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांसह ८१ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेड इव्हान्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यरने दोन चौकारांच्या मदतीने १८ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. तिलक वर्मा ११ धावा करुन नाबाद राहिला, तर रिंकू सिंग डावाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. रिंकू सिंगने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. भारताने २० षटकांत पाच विकेट्स गमावून १९२ धावांचा डोंगर उभा केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची फलंदाजी खराब होती, परंतु रायन बर्लने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. परंतु, त्याचे अर्धशतकही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. बर्ल ४३ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. वेस्ली माधेवेरेने २८, तर बेन करनने २० धावा केल्या. भारताकडून मयंक यादवने तीन, तर यश ठाकूरने दोन विकेट्स घेतले. अशोक शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. झिम्बाब्वेला २० षटकांत सात विकेट्स गमावून केवळ १५७ धावाच करता आल्या. भारताने झिम्बाब्वेवर ३-० ने क्लीन स्वीप पूर्ण केला.
भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.
झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधवेरे (विकेटकीपर), तडवनाशे मारुमणी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.






