Pahalgam Terror Attack : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी राजकारणातून पुन्हा एकदा चिथावणीखोर आणि असंवेदनशील विधान समोर आले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवाशा मोहम्मद झई खान यांनी बाबरी मशीद संदर्भात केलेले विधान भारताच्या धार्मिक भावनांवर आणि अंतर्गत सार्वभौमत्वावर थेट आक्षेपार्ह हस्तक्षेप मानले जात आहे.
पलवाशा खान यांनी म्हटले की, “बाबरी मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी पहिली वीट पाकिस्तानी सैन्य रचेल आणि पहिली अजान जनरल असीम मुनीर देतील.” या वक्तव्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. कारण अयोध्येतील राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बंद झालेले आहे, आणि तो भारताच्या न्यायिक व्यवस्थेचा अंतिम निकाल मानला जातो.
धर्म आणि राजकारणाच्या सीमा ओलांडल्या
पलवाशा खान यांचे विधान केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर भारताच्या सार्वभौम निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न मानला जातो. त्यांनी यासोबतच खलिस्तानी आंदोलनाचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याचंही कौतुक करत, त्याला “धाडसी व्यक्ती” असे संबोधले. ही बाब भारतासाठी अधिक चिंताजनक ठरते, कारण पन्नू भारतविरोधी कारवायांत सक्रिय असून विखंडनवादी विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: ‘पुढील 24 तासांत हल्ला होईल…. ‘ पाकचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांचे खळबळजनक विधान
बिलावल भुट्टो ते हनीफ अब्बासी, भारतविरोधी भाषा सुरूच
हे विधान एखाद्या अपवादासारखे वाटू नये, कारण पाकिस्तानातील अनेक नेते सातत्याने भारतविरोधी आणि युद्धखोर वक्तव्ये करत आहेत. काही दिवसांपूर्वी, बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू पाणी करारावर बोलताना “रक्ताच्या नद्या वाहतील” असे म्हणत धोक्याची भाषा वापरली होती. त्याचप्रमाणे, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनीही अणुहल्ल्याची धमकी देताना म्हटले होते की, “आमच्याकडे भारतासाठी राखीव ठेवलेली शेकडो क्षेपणास्त्रे आहेत.”
🚨Pakistani Senator Palwasha Zai Khan:
“The first brick of the new Babri Mosque in Ayodhya will be laid by Pakistan Army soldiers, and the first azan will be given by Pakistan Army Chief General Munir.”
“We are not wearing bangles.”
When the war is over bring her to India. pic.twitter.com/t9e6KLWrct
— BALA (@erbmjha) April 30, 2025
credit : social media
पहलगाम हल्ल्यानंतर तणावात भर
हे विधान अशा वेळी करण्यात आले आहे, जेव्हा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात ४-५ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि धर्माच्या आधारे नागरिकांची निवड करून हत्या केली, ही बाब अत्यंत भयावह आणि अमानवी आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि त्याच्या आश्रयदात्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. भारताची सुरक्षा धोरणे आता अधिक आक्रमक होत चालली आहेत आणि सीमारेषेवरील घडामोडींवर कडक नजर ठेवण्यात येत आहे.
राजनैतिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
पलवाशा खान यांच्या विधानावर भारतात सर्वपक्षीय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारत सरकारने हे वक्तव्य अतिशय गंभीरतेने घेतले असून, परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानकडे औपचारिक निषेध नोंदवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, यासारखी विधाने द्वेष पसरवण्याचे आणि द्विपक्षीय संबंध आणखी बिघडवण्याचे काम करत आहेत, हे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या ‘डर्टी वर्क’च्या विधानावर अमेरिकेची प्रतिक्रिया; पाक आता जागतिक पातळीवर अडचणीत
नफरत आणि हस्तक्षेपाचे नवे शस्त्र
पाकिस्तानकडून सातत्याने होणारी धार्मिक राजकारणाची हस्तक्षेपात्मक वक्तव्ये आणि भारतविरोधी युद्धखोर भाषा, हे केवळ राजकीय स्टंट नसून भारताच्या अंतर्गत शांतता आणि सार्वभौमत्वावर होणारा हल्ला आहे. अशा वक्तव्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी भारतीय धोरणकारांकडून होऊ लागली आहे. भारतात अयोध्येचा प्रश्न न्यायालयीन मार्गाने सोडवला गेला आहे, आणि अशा संवेदनशील मुद्द्यावर पाकिस्तानच्या हस्तक्षेपाचे प्रकार निषेधास पात्र ठरतात. भारताच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या अशा विधानांना योग्य तो उत्तर देणे आवश्यक आहे.