जर्मनीमध्ये पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात म्युनिकमध्ये भारतीय समुदायानेही मोर्चा काढला, शांतता आणि न्यायाचे आवाहन केले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
म्युनिक (जर्मनी) : भारतात नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर्मनीतील म्युनिक शहरात भारतीय समुदायाने मोठ्या संख्येने एकत्र येत ‘भारत शांती मार्च’ काढला, ज्यात शांततेचे आणि न्यायाचे सामूहिक आवाहन करण्यात आले. या शांततामय मोर्चामध्ये ७०० हून अधिक भारतीय नागरिक सहभागी झाले होते.
शनिवारी, ३ मे रोजी सकाळी ११ वाजता गेश्विस्टर-शॉल-प्लॅट्झ येथे नागरिकांनी एकत्र येत मोर्चाची सुरुवात केली. या मार्चमध्ये सहभागी लोक हातात तिरंगा ध्वज घेऊन, दहशतवादाविरोधात घोषणाबाजी करत शहरातून म्युनिक फ्रीहाइट या ठिकाणी पोहोचले. दुपारी २ वाजता मोर्चाचा समारोप झाला. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सामूहिकपणे गायले गेले, आणि पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शोभित सरीन, शिवांगी कौशिक आणि दिव्यभ त्यागी यांनी सांगितले की, हा मोर्चा केवळ प्रतीकात्मक नव्हता, तर ज्यांचा आवाज पहलगाममध्ये दाबण्यात आला होता, त्यांच्यासाठी न्यायाची जोरदार मागणी करणारा एक सामूहिक प्रयत्न होता. शोभित सरीन म्हणाले, “ही केवळ शांतता यात्रा नव्हती. ती न्यायासाठी एक सामूहिक आवाहन होती. शांतता, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा मोर्चा होता.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘चर्चा बंद खोलीत व्हावी….’ भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची UNSC मध्ये बैठकीपूर्वी विनंती
या कार्यक्रमाला केवळ भारतीय समुदायाचे नव्हे, तर स्थानिक जर्मन नेत्यांचाही मोठा पाठिंबा मिळाला. जर्मनीच्या बुंडेस्टॅगचे सदस्य आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हान्स थेइस, तसेच म्युनिक सिटी कौन्सिलर डेली बालिदेमाज यांनी आपल्या भाषणांतून दहशतवादाचा निषेध करताना भारतीय समुदायाच्या एकतेचे कौतुक केले.
डॉ. थेइस म्हणाले, “ही शांती यात्रा जगाला एक सशक्त संदेश देते – की आपण द्वेष नाकारतो, शांतता स्वीकारतो. अशा भ्याड कृत्यांचा कायमचा अंत व्हायला हवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू नये यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.” बालिदेमाज यांनीही एकता, सहिष्णुता आणि शांततेचा संदेश दिला आणि भारतीय समुदायाच्या संयम व सक्रियतेचे विशेष कौतुक केले.
या शांती मोर्चामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक, कुटुंबीय, उद्योजक आणि समाजसेवक अशा सर्व स्तरांतील भारतीय नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी दहशतवादाविरोधात एकजुटीने उभे राहण्याची शपथ घेतली.
शिवांगी कौशिक म्हणाल्या, “आम्हाला जगाला हे दाखवायचं आहे की, भारत एकसंध आहे. अशा हल्ल्यांमुळे आपण डगमगत नाही, उलट अधिक मजबूत होतो.” दिव्यभ त्यागी म्हणाले, “जगभरात भारतीय समुदाय शांततेचा आणि मानवतेचा संदेश पोहोचवत आहे. दहशतीला या जगात जागा नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात दाखल, एर्दोगान यांचे रणनीतिक पाऊल; काय असेल भारताचा डाव?
म्युनिकच्या शांती मोर्चाबरोबरच बर्लिन, स्टुटगार्ट यांसारख्या इतर जर्मन शहरांमध्येही भारतीय समुदायाने शांततामय निदर्शने केली. ही आंदोलने केवळ दहशतवादाचा निषेध करणारी नव्हती, तर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी जागतिक स्तरावर ऐक्याचे प्रतीक ठरली.
म्युनिकमधील ‘भारत शांती मार्च’ हे फक्त मोर्चा नव्हता. तो भारतीयांच्या मनात दहशतीविरोधात उफाळून आलेला रोष, पीडितांच्या प्रती सहवेदना, आणि शांततेसाठीचा दृढनिश्चय होता. या आंदोलनाने जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायाचा एकत्रित आवाज पुन्हा एकदा जगापुढे आणला – दहशतवादाविरोधात शांतीने, पण ठामपणे उभे राहणारा आवाज.