भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने जागतिक स्तरावर एक नवा टप्पा गाठला आहे. देशात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी पसंती मिळत असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जून २०२६ अखेर भारताच्या ई-व्ही निर्यातीत १४ पटींची अवाढव्य वाढ नोंदवली गेली आहे.
आकडेवारी काय सांगते?
नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत भारताने तब्बल १५,६४१ इलेक्ट्रिक कार्सची परदेशात निर्यात केली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा अवघा १,१२२ युनिट्स इतका होता. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या एकूण २८,६५२ ई-व्ही निर्यातीपैकी निम्म्याहून अधिक गाड्या एकट्या या तीन महिन्यांत निर्यात झाल्या आहेत.
Mahindra Thar vs Force Gurkha vs Maruti Jimny! कोण ठरेल यातील ऑफ-रोडिंगचा खरा मदमस्त बाहुबली?
मारुती सुझुकीचा मोठा वाटा
या ऐतिहासिक घोडदौडीत मारुती सुझुकीने सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘मारुती ई-व्हिटारा’ जागतिक बाजारात प्रचंड यशस्वी ठरली आहे. जून तिमाहीत भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या कार्सच्या यादीत ही तिसऱ्या स्थानावर पोहोचली.
एकट्या ‘ई-व्हिटारा’चे १५,२१० युनिट्स तब्बल ४७ देशांमध्ये पाठवण्यात आले. मारुतीच्या गुजरात प्लांटमध्ये निर्मित ही एसयूव्ही सध्या युरोपसह अनेक प्रमुख देशांत निर्यात केली जात आहे. मारुतीने ई-व्हीसाठी अवलंबलेल्या ‘एक्सपोर्ट फर्स्ट’ धोरणाचा हा मोठा विजय मानला जात आहे.
हॅचबॅक मार्केटमध्ये मारुती अल्टोचा डबल धमाका; ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोझची मोठी घसरण!
टाटा आणि महिंद्राही शर्यतीत उतरणार
मारुती सुझुकीचे यश पाहून आता टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांनीही आपल्या इलेक्ट्रिक कार्स आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. टाटा मोटर्सने आपली आगामी ‘टाटा सिरिया ई-व्ही’ युरोपियन बाजारात लाँच करण्यासाठी आवश्यक काम सुरू केले आहे. दुसरीकडे, महिंद्रा सध्या आपल्या व्यावसायिक ई-व्ही गाड्या परदेशात विकत असून, त्यांच्याकडे आधीपासूनच अनेक देशांमध्ये भक्कम डीलर नेटवर्क उपलब्ध आहे. याचा फायदा कंपनीला पॅसेंजर ई-व्ही निर्यातीसाठी होईल.
भारतीय कंपन्यांसाठी मोठी संधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारे इंधनाचे दर आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी यामुळे भारतीय वाहन उत्पादकांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यामुळे गाड्यांचा उत्पादन खर्च कमी होतो, ज्यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारात अधिक स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल. भारतीय ई-व्ही उद्योग आता जागतिक स्तरावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.






